धावत्या रेल्वेत ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरूणाचे निधन; राणीचन्नमा एक्सप्रेसमधील घटना
आळते वार्ताहर
पाडळी ता.तासगाव येथील तरुण आपल्या परिवारासोबत मिरजेहून तामिळनाडूला राणीचन्नमा एक्सप्रेसने जात असताना कर्नाटक राज्यातील बेळगाव ते खानापूर दरम्यान धावत्या रेल्वेत अचानक चक्कर येऊन ह्रदयविकाराचा धक्का बसून निधन झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुंडलिक जंबू माळी (वय-४४),पत्नी रेश्मा माळी व दोन मुले (रा.पाडळी ता.तासगाव) ही सर्वजन काही दिवसापूर्वी एका जवळच्या पाहुण्याचे निधन झाले होते म्हणून तामिळनाडूमधून भेट घेण्यासाठी गावी पाडळीला आले होते.पंधरा दिवसानंतर ते सर्वजन परत तामिळनाडूला राणीचन्नमा एक्सप्रेसने मिरज रेल्वे स्थानकातून तामिळनाडूकडे निघाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बेळगाव ते खानापूर दरम्यान धावत्या रेल्वेमध्येच कुंडलिक माळी यांना आचानक चक्कर आली व ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला व धावत्या रेल्वेमध्येच निधन झाले. खानापूर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांच्या मदतीने सर्वांना उतरवण्यात आले. बेळगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.मृत कुंडलिक माळी यांचे मूळ गाव पाडळी असून ते तामिळनाडू येथे गलाई व्यावसाय करत होते तसेच तामिळनाडू राज्यातील तिरुपत्तूर जिल्हा गलाई असोसिएशनचे सभासद होते.त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत. अचानक झालेल्या निधनाने पाडळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.