योगी यांचा कामगारांशी संवाद
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिलक्यारा बोगद्यातून सुखरुप सुटका झालेल्या कामगारांशी संवाद साधला आहे. या 41 कामगारांची सुटका 17 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी यशस्वीपणे करण्यात आली होती. अशाप्रकारे कामगारांची सुटका करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रसंग मानला जातो.
योगी आदित्यनाथ यांनी या कामगारांना शाली आणि भेटवस्तू दिल्या. तसेच त्यांच्या निर्धार आणि धाडसाचे कौतुक केले. बोगद्यात अडकल्यानंतर आम्ही आमची सुटका होईपर्यंत धीर सोडला नाही. एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही आमचा धीर टिकवून धरला. प्रशासनानेही आमच्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यामुळे आमची सुटका होऊ शकली, असे या कामगारांनी स्पष्ट केले.
सुखरुप सुटलेल्या 41 कामगारांपैकी 8 कामगार उत्तर प्रदेशातील होते. अंकित वय 25, राम मिलन वय 32, सत्यदेव वय 44, संतोष वय 24, जयप्रकाश वय 22 आणि राम सुंदर वय 26 हे कामगार श्रावस्ती जिल्ह्यातील, मनजीत वय 22 हा कामगार लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तर अखिलेश कुमार वय 32 हा मिर्झापूर जिल्ह्यातील आहे. ते सर्व 12 नोव्हेंबरला बोगद्यात अडकले होते.
महत्प्रयासाने सुटका
या सर्व कामगारांची सुटका महत्प्रयासाने करण्यात आली होती. या सुटका अभियानासाठी अनेक संस्थांचे साहाय्य घेण्यात आले होते. तसेच विदेशातून बोगदातज्ञही आणण्यात आले होते. हे अभियान अत्यंत जटील आणि अवघड होते. तथापि, ते निर्धाराने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले.