यात्रा-जत्रा, लग्नसराईची बाजारात लगबग
खरेदीला वेग, उलाढाल वाढली, बाजारपेठेला बहर : कापड,सराफी दुकानांतूनही ग्राहकांची वर्दळ
बेळगाव : यात्रा-जत्रा आणि लग्नसराईच्या हंगामाला प्रारंभ झाल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. कपडे, सोने, चांदी याचबरोबर किराणा बाजाराची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारात उलाढाल वाढताना दिसत आहे. एप्रिल व मे महिन्यात मुख्य बाजारपेठेसह इतर ठिकाणी खरेदी-विक्री वाढलेली असते. त्यामुळे बाजाराला बहर येवू लागला आहे. यंदा एप्रिल महिन्यातच अधिक लग्नाचे मुहूर्त आहेत. मे महिन्यात केवळ 2 ते 4 मुहूर्त आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात अधिक लग्नांचा बार उडणार आहे. त्यामुळे बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी वेग येवू लागला आहे. विशेषत: गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, कडोलकर गल्ली, रामदेव गल्लीत गर्दी होऊ लागली आहे. यंदा तालुक्यातील सांबरा, बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप आणि बेनकनहळ्ळी गावची महालक्ष्मी यात्रा तोंडावर आली आहे. यापैकी बिजगर्णी, कावळेवाडी यात्रेला 16 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बाजारात खरेदीची उलाढाल वाढली आहे.
नवीन कपडे, सोने, चांदी त्याचबरोबर इतर साहित्याला मागणी वाढली आहे. विशेषत: महालक्ष्मी यात्राकाळात मांसाहारी जेवणावळीला पसंती दिली जाते. त्यामुळे बकरी बाजारालाही तेजी आली आहे. शनिवारी बकरी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांची खरेदी झाली. बिजगर्णी, कावळेवाडी पाठोपाठ 23 एप्रिलपासून बेनकनहळ्ळी गावच्या महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ होणार आहे. एकूणच यंदा तालुक्यातील 5 गावांच्या महालक्ष्मी यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीचा वेग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यातच एप्रिल महिन्यात लग्नाचे मुहूर्त अधिक असल्याने लग्न सराईसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीही वाढली आहे. त्यामुळे बाजारात यात्रा, जत्रा आणि लग्नसराईच्या खरेदीची लगबग पहावयास मिळत आहे. लग्नसराईच्या हंगामाला जोर आल्याने कापड आणि सराफी दुकानातूनही वर्दळ वाढली आहे. याचबरोबर लग्नपत्रिका, मंडप डेकोरेशन, बाशिंग आणि इतर लग्नाच्या साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे यात्रा-जत्रा आणि लग्नसराईची धामधूम पहावयास मिळत आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाजारात सकाळी आणि सायंकाळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.