‘डब्ल्यूटीओ’ प्रतिमेची शंभू सीमेवर जाळपोळ
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. सोमवारी शेतकरी संघटनांनी शंभू आणि खनौरी सीमेवर जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) पुतळ्याचे दहन केले. ‘डब्ल्यूटीओ’च्या पुतळ्याची उंची 20 फूट होती. यावेळी शेतकऱ्यांनी फटाकेही फोडले. या आंदोलनात महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र आणि हरियाणा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर शेतकऱ्यांनी शंभू सीमेपासून राजपुरापर्यंत ट्रॅक्टर मोर्चाही काढला. याचदरम्यान शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी आंदोलनाची दिशा पुन्हा एकदा स्पष्ट केली. एमएसपी हमीभाव कायदा होईपर्यंत, देशातील शेतकरी व शेतमजुरांचे कर्ज माफ होईपर्यंत, लखीमपूर खेरीला न्याय मिळेपर्यंत, सी2-50 सह पिकांचे भाव मिळेपर्यंत, सर्व खटले मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.