विरियातो यांचे वक्तव्य... संविधानाला आव्हान
विरियातो यांचे हे विधान वरवरचे नसून त्याचा अंतस्थ हेतु काय असू शकतो? कोण सांगू शकतो? मात्र ते विधान बाबासाहेब आंबेडकर आणि या स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राच्या संविधानाचा अपमान करणारे आहे. त्यामुळे हे विधान गांभीर्याने घेऊन सर्व संबंधित प्राधिकरणांकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा जर सुजाण, राष्ट्रप्रेमी जनतेने धरली, तर त्यात चूक आहे, असे अजिबात वाटत नाही.
10 मार्च 2019 या दिसा आमी काँग्रेस प्रेसिडेंट राहुल गांधीक आमी मेळले. आमी 12 प्र्रश्न मांडले. बारा इश्युजान एक इश्यू आसलो, वी डिमांड ड्युअल सिटिझनशिप फॉर द सिटिझन्स ऑफ गोवा.
ताणे (राहुल गांधी) विचारले ‘इज इट कॉन्स्टिट्यूशनल?’
हांवे म्हळे, ‘नो’
तो म्हुणपा लागलो, ‘दॅन नो डिस्कशन’
हांवे सांगले, ‘व्हॅन कॉन्स्टिट्यूशन वॉज इम्पिलीमेन्टेड ऑन 26 जानेवारी 1950, व्हॅन वी वर नो पार्ट ऑफ इंडिया. आनी जेन्हा आमी नायन्टीन सिक्स्टी वनान लिबरेट जाले, तेन्ना तुमी जे कॉन्स्टिट्यूशन पास केल्ले तातून आमकां इन्क्लूड करुंक ना, तें हाडून आमच्या तोकलेर मारले...
वर उद्धृत करण्यात आलेले विधान कोकणी, इंग्रजी मिश्रीत असून ते लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे सध्या वादग्रस्त ठरलेले आहे. “तें हाडून आमच्या तोकलेर मारले.” म्हणजे ते आणून आमच्या डोक्यावर मारले. ते म्हणजे संविधान. म्हणजे संविधान आणून आमच्या डोक्यावर मारले. मारले म्हणजे लादले. आमच्या म्हणजे गोंमतकीयांवर लादले. असे विरियातो म्हणतात म्हणजे समस्त गोमंतकीय म्हणतात असे नाही. परंतु विरियातो यांची जी मानसिकता या विधानात व्यक्त झाली आहे, ती गोव्यातील एका विशिष्ट वर्गात आहेच. मात्र निवडणुकीतील उमेदवाराने अशी संविधानाच्या विरोधात मुक्ताफळे उधळणे हे फार गंभीर आहे. या देशाला मानणाऱ्या, हा देश चालविणाऱ्या संविधानाला मानणाऱ्या राष्ट्रप्रेमी जनतेला हे कदापि सहन होणारे नाही. म्हणून गोव्यासह देशभरातील राजकारणात सध्या त्यावरुन आरोप-प्रत्त्यारोपांच्या फैरी झडत आहेत, दुसऱ्या बाजूने राष्ट्रप्रेमी जनतेमध्ये संविधानाच्या अपमानाबद्दल, ज्यांनी या संविधानाची निर्मिती केली त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरियातो यांनी केलेल्या अपमानाबद्दल असंतोष आहे. विरियातो यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. देशभरातील अनेकांनी घेतली आहे, कारण ते विधान तेवढेच गंभीर आहे. परंतु विरियातो यांचे हे विधान वरवरचे नसून त्याचा अंतस्थ हेतु काय असू शकतो? कोण सांगू शकतो? मात्र ते विधान बाबासाहेब आंबेडकर आणि या स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राच्या संविधानाचा अपमान करणारे आहे. त्यामुळे हे विधान गांभीर्याने घेऊन सर्व संबंधित प्राधिकरणांकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा जर सुजाण, राष्ट्रप्रेमी जनतेने धरली, तर त्यात चूक आहे, असे अजिबात वाटत नाही.
विरियातो यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहता त्यांच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याच्या त्यांच्या कंपूचा कांगावा म्हणजे धडधडीत खोटारडेपण आहे. विरियातो पुढे म्हणतात, हे जे संविधान तुम्ही आमच्यावर लादले (तोकलेर मारले) त्याची अंमलबजावणी केली तुम्ही ती 26 जानेवारी 1950 साली. गोवा मुक्त झाला 1961 साली. जेव्हा तुम्ही ते संमत केले होते, त्यावेळी आम्ही भारताचा भाग नव्हतो. पण तुम्ही त्यामध्ये आमचा समावेश न करता ते आमच्यावर लादले. जम्मू व काश्मीरसाठी 370 कलम दिले, गोव्याला काहीच दिले नाही...
विरियातो यांच्या विधानानुसार ते स्वत:ला भारतीय मानत नाहीत काय, असा संशय येतो. त्यांना भारतीय संविधान नकोच असे वाटते. त्यांच्या मतानुसार जेव्हा संविधान संमत करण्यात आले होते ते गोवा भारताचा भाग नव्हता, म्हणजे तो पोर्तुगालचा भाग होता, म्हणून संविधान त्यांना मान्य नाही, असा सरळ अर्थ निघतो. पण हा अर्थ त्यांनी नौदलात नेकरी मिळविताना गुंडाळून ठेवला होता. वास्तविक गोवा मुक्त झाल्यानंतर 27 मार्च 1962 रोजी भारतीय संविधानात 12 व्या दुरुस्तीद्वारे गोवा भारतीय संघराज्यात सामावून घेण्यात आला. विरियातो सध्या ज्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्या पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी हे विधेयक मांडून ते संमत करण्यात आले होते. विरियातो यांचे संविधानाचा अपमान करणारे विधान काँग्रेसला मान्य आहे, म्हणूनच तर अमित पाटकरसह सर्वजण त्यांची पाठराखण करत आहेत. म्हणजे हे संविधान काँग्रेसनेच लादले होते हे आजच्या काँग्रेसला मान्य आहे, मग ते मागे घेण्यासाठी काँग्रेसने गेल्या 62 वर्षांत का प्रयत्न केले नाहीत?
विरियातो फर्नांडिस हे भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत, हे जेव्हा अलीकडे गोमंतकीयांना समजले तेव्हा त्यांच्याबद्दल अभिमान वाटणे स्वाभाविक होते. राष्ट्ररक्षणाचे काम करणाऱ्या जवानांबद्दल राष्ट्रप्रेमी जनतेला नेहमीच अभिमान, आदर असतो. म्हणूनच विरियातो हे काँग्रेसचे असले तरी ते जवान असल्याने त्यांच्याबद्दल आदर वाटला. कारगिलच्या युद्धात त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना पदक मिळाल्याच्या माहितीने त्यांच्याबद्दलचा अभिमान आणखी वाढला. मात्र आता संविधानाच्या अपमानाच्या वक्तव्याने उघड झालेली प्रवृत्तीच त्यांची असली प्रवृत्ती आहे काय? असा प्रश्न उभा राहतोच. संविधान लादले, असे जर त्यांना वाटते तर मग याच संविधनाच्याअंतर्गत कार्यरत असलेल्या नौदलात का दाखल झाले? तेव्हा संविधान लाभदायी ठरले म्हणून? विरियातोसारख्या अनेकांना ‘ड्युअल सिटिझनशिप’ म्हणजे दुहेरी नागरिकत्व हवे आहे. मात्र आपल्या सार्वभौमत्वाच्या संविधानात तशी तरतूद नाही. पुढेही ती करता येणार नाही. दुहेरी नागरिकत्व मागतात म्हणजेच तुम्ही या देशाला मानत नाहीत. विरियातोसारखेच लाखो लोक गोव्यात आहेत, ज्यांना दुहेरी नागरिकत्व म्हणजे भारताबरोबरच पोर्तुगाली नागरिकत्व हवे आहे. पण पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारण्याचा विचारही मनात आणणे म्हणजे या देशात राहून देशाशी द्रोह करणे आहे.
विरियातो यांनी संविधानाचा अपमान केल्याबद्दल राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन भाजपाने उचितच केले आहे. विरियातो यांचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वी त्यांनी जासिंतो बेटावर तिरंगा फडकविण्यासाठी विरोध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या फादरच्या विधानाचेही समर्थन केले होते. असे सांगून भाजपाने आता या दोन्ही प्रकरणी पोलीसात तक्रारी केल्या आहेत. फक्त निवडणुकीच्या प्रचारातील धुरळा म्हणून विरियातोकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विरियातो हे निवृत्त नौदल जवान असूनही त्यांची ही संविधानविरोधी, छत्रपती शिवाजी महाराजविरोधी, राष्ट्रीय ध्वज तिरंगाविरोधी मानसिकता गोव्यासह राष्ट्राला घातक आहे.
राजू भिकारो नाईक