वीज दरवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार
कला अकादमी, स्मार्ट सिटीवरही चर्चा करणार खासदार तानावडे
पणजी : राज्यात करण्यात आलेली वीज दरवाढ, कला अकादमीच्या विषयावरून कलाप्रेमींनी दिलेला इशारा आणि राजधानीतील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे जनतेतून आजही असलेला रोष या विषयांवर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. मंगळवारी क्रांतिदिनी आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून दुऊस्तीच्या नावाखाली कला अकादमी बंद आहे. ती खुली होण्याच्या प्रतीक्षेतून कलाकार आणि कलाप्रेमींच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि सोमवारी त्यांनी राजधानीत मोठी बैठक घेऊन सरकारसह कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना धारेवर धरले. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे या बैठकीस खुद्द कला संस्कृतीमंत्रीही उपस्थित राहिले होते, तरीही वक्त्यांनी आपल्यातील संतापाला वाट मोकळी करून देताना चक्क मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
याबद्दल पत्रकारांनी तानावडे यांना विचारले असता, सदर विषयातील गांभीर्य सर्वांना समजले आहे. त्याचबरोबर नुकतीच करण्यात आलेली वीज दरवाढही लोकांच्या पचनी पडलेली नसल्याचे राज्यभरातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट झाले आहे. विषय राज्य सरकारचा आहे. त्याचा केंद्र सरकार किंवा मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यावर स्थानिक पातळीवरच निर्णय होईल व त्यासंबंधीही मुख्यमंत्र्यांकडे बोलणार असल्याचे तानावडे म्हणाले. गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून राजधानीत चाललेल्या स्मार्ट सिटीची कामे संपणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला असता, हा विषय मुख्यमंत्र्यांनीही गांभीर्याने घेतला आहे. तरीही आपण त्याविषयावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे तानावडे यांनी पुढे सांगितले.