पराभवाने खचणार नाही : माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर
खानापूर : लोकसभा निवडणुकीत कारवार मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी बेंगळूर येथे राहुल गांधी यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी चर्चा करताना लोकशाहीत जय पराजय हा एक भाग असून आपण सामान्य जनतेसाठी कायम आवाज उठविण्याचे आवाहन केले.याला अंजली निंबाळकर यांनी प्रतिसाद देत आपण पराभवाने अजिबात खचून जाणार नसून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी माझा लढा कायम राहील तसेच काँग्रेस संघटनसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू, असे स्पष्ट केले. कारवार लोकसभा मतदारसंघात माजी आमदार अंजली निंबाळकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती.
यावेळी त्यांनी आपल्या नेत्या व कार्यकर्त्यांसह प्रचारात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीसंदर्भात तर्कवितर्क लढविण्यात आले होते. शुक्रवारी राहुल गांधी यांची बेंगळूर दौऱ्यावर त्यांनी भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. आपण काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून निश्चित सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढत राहीन तसेच खानापूर तालुका काँग्रेस संघटनेसाठी नव्याने उभारी घेऊन चुकांची दुरुस्ती करून काँग्रेस संघटना पुन्हा पुनर्बांधणी करून आपण कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले.तसेच भविष्यात खानापूर तालुका काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची फळी उभारून काँग्रेसचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपण निश्चित कार्यरत राहण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.