टी-20 वर्ल्ड कपसाठी कोहलीला वगळणार?
नवी दिल्ली
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरुषांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी प्राथमिक संघाची यादी आयसीसीकडे पाठविणे आवश्यक असून सर्वच देशांच्या संघनिवडीसाठी आयपीएल स्पर्धा आधारभूत ठरणार आहे. पण भारतीय क्रिकेटचा विचार करता माध्यात आलेल्या वृत्तानुसार निवड समितीकडून विराट कोहलीला वगळले जाण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड कप स्पर्धा अमेरिका व विंडीजमध्ये आयोजित करण्यात आली असून 2 ते 29 जून या कालावधीत ही स्पर्धा होईल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले असून तसे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते. द टेलिग्राफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात विराट कोहलीची निवड निश्चित नसल्याचे म्हटले आहे. 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे निवड समिती कठोर निर्णय घेऊ शकते, त्यात कोहलीला वगळण्याचा निर्णयही असेल.
टी-20 प्रकारात कोहली सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र आयपीएलमध्ये कोहलीने चांगली कामगिरी केल्यास त्याच्या समावेशाबाबत पुनर्विचार होऊ शकेल. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. कोहलीबाबतचा निर्णय हा नाजूक विषय असून त्यात बीसीसीआय गुंतण्यास तयार नाही. निवड समितीच त्याच्याबाबत काय तो निर्णय घेईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी कोहलीशी चर्चा केली असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.