मये इव्हॅक्यू प्रॉपर्टीतील ‘ती’ बांधकामे पाडणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा
पणजी : मयेच्या इव्हॅक्यू प्रॉपर्टीतील 2014 नंतरची सर्व बांधकामे सरकार 100 टक्के पाडणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. तेथील जमिनीची खरेदी-विक्री करताना लोकांनी काळजी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. काही दलालांकडून तेथील जमिनींचे भूखंड तयार करून ते विकण्याचा धंदा चालू आहे. ती मालमत्ता सरकारची असून कोणाला विकता येणार नाही. त्याला सरकारची अनुमती नाही. म्हणून तेथे जर कोण जमिनीचा खरेदी, विक्रीचा व्यवहार करीत असेल तर त्यांनी सावध रहावे आणि त्या भानगडीत पडून नये, असा सल्ला डॉ. सावंत यांनी दिला आहे. त्या जमिनीत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. तरी देखील बांधकामे झाल्यास ती बेकायदा ठरवून पाडण्यात येतील, असे सावंत यांनी बजावले आहे. इव्हॅक्यू प्रॉपर्टीतील 700 प्रकरणे सोडवून निकालात काढण्यात आली आहेत. काही प्रकरणे योग्य ती कागदपत्रे नसल्याने प्रलंबित आहेत. त्यांना आवश्यक ती कागदपत्रे आणण्यास सांगितले असून उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट आहे. तेथील कृषी जमिनीविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासाठी फॉर्म 6 हे कागदपत्र आवश्यक आहे. लोकांचा प्रतिसाद, त्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.