‘नेट’ परीक्षा ठरली डोकेदुखी!
पालकांना केंद्राच्या बाहेरच अडविले : सुविधा नसल्याने झाले हाल
पणजी : उच्चस्तरीय परीक्षा केंद्र निश्चित करताना परीक्षार्थींबरोबर येणाऱ्या त्यांच्या नातेवाईक वा मित्रमंडळींचा विचार केला जात नाही. त्यामुळे अशा मंडळींचे खुपच हाल होतात. 18 रोजी महाकष्टाने दिलेली नेट परीक्षा या अनेक पाल्यांसाठी फार मोठे दिव्य ठरले. एवढे झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी या परीक्षा रद्दबातल ठरल्या आहेत. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.मंगळवार दि. 18 रोजी गोव्यात नेट परीक्षा केवळ एकाच केंद्रावर ठेवल्या. केपे सरकारी महाविद्यालयात या परीक्षा ठेवण्यात आल्या. महाविद्यालयाच्या गेटबाहेरच सर्वांना अडविण्यात येऊन केवळ परीक्षार्थींनाच आत प्रवेश दिला. गेटबाहेरील परिसर म्हणजे सर्वत्र जंगल. आजूबाजूला कुठेही घर नाही वा शेड नाही. परीक्षा जरी 9.30 वा. असली तरी परीक्षार्थींना सकाळी 7.30 वा. बोलाविले होते. परीक्षेचे केंद्र ठरविताना परीक्षार्थी केवळ केंद्राच्या परिसरातीलच असतील, असे नाही तर संपूर्ण गोव्यातून येणारे होते. ते दूरवरून येणारे म्हणजेच काही जणांना पहाटे 6 वा. घरातून बाहेर पडावे लागले.
गेटच्या बाह्या परिसरात कुठेही ना निवारा ना शौचालयाची व्यवस्था. सुदैवाने त्या दिवशी पावसाने विश्रांती घेतलेली. पाऊस पडला असता तर या मंडळींची गैरसोय झाली असती. कित्येकजण दुचाकी घेऊन आलेले. दुपारी 1 वा. पर्यंत त्यांना तिथे थांबायचे होते. पुरुषवर्ग कशाही प्रकारे तडजोड करू शकतात. मात्र महिलावर्गाचे हाल झाले. त्यांच्यासाठी शौचालय सुविधा देखील नव्हती. त्यातच एका गरोदर महिलेचे हाल झाले. एक दोन मासिक अडचणीत सापडलेल्या मुलींचेही हाल झाले. एवढे सर्व झाल्यानंतर व मुलांनी कष्ट करून केलेला अभ्यास व त्यानंतर दिलेली ही परीक्षा दुसऱ्या दिवशी रद्द केली जाते. म्हणजेच साऱ्या परीक्षार्थींचे कष्ट वाया गेलेच. शिवाय पालकांना देखील प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. आता नव्याने परीक्षा घेताना परीक्षार्थींबरोबर येणाऱ्या व्यक्तींची सुविधादेखील लक्षात घेऊन परीक्षा केंद्र निवडावे, असे आवाहन अनेक परीक्षार्थींच्या नातेवाईकांनी केले. गोवा सरकारचे जे अधिकारी याची जबाबदारी पहातात त्यांनी थोडेतरी डोके वापरावे, असे आवाहन पालकांनी केले आहे.