For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्त्याला वाली कोण?

10:46 AM Mar 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्ले बेळवट्टी संपर्क रस्त्याला वाली कोण
Advertisement

वाहतुकीसाठी रस्ता बनला धोकादायक : प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनधारकांसह स्थानिकांतून तीव्र संताप

Advertisement

वार्ताहर/किणये

कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून होत आहेत. या रस्त्याचा बहुतांशी भाग पूर्णपणे उखडून गेलेला आहे. रस्त्यावरून वाहतूक करणे मुश्कील बनले आहे. या रस्त्याची दुरवस्था होऊनही याकडे कानाडोळा केला जात आहे. या रस्त्याला वाली कोण? असा सवाल या भागातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत. कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्यावर वाहनधारकांची वर्दळ वाढलेली आहे. मात्र रस्त्याची सद्यस्थिती पाहता रस्ता पूर्णपणे खड्ड्यात हरवलेला आहे. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर धूळ-मातीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासन या रस्त्याकडे कधी लक्ष देणार? या खड्डेमय रस्त्यासाठी आम्ही दाद मागायची कोणाकडे? अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Advertisement

कर्ले, बेळवट्टी, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, इनाम बडस, बहाद्दरवाडी, किणये, नावगे, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल आदी गावातील वाहनधारकांसाठी हा संपर्क रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे काही दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झालेले आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. 2019 साली अतिवृष्टी झाली. यावेळी रस्त्यावर पाणी आले होते. या मुसळधार पावसात रस्त्याचा काही भाग बऱ्याच ठिकाणी वाहून गेला होता. त्याठिकाणी सध्या मोठमोठे भगदाड पडले आहेत. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. येणाऱ्या वाहनधारकांना सदर भगदाड असलेल्या रस्त्याचा अंदाज येत नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

वास्तविक अतिवृष्टीनंतर रस्तादुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली. या लोकांना केवळ आश्वासनावरच समाधान मानावे लागले. रस्त्याच्या आजूबाजूला कर्ले व बेळवट्टी गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची रोज ये-जा सुरू असते. खड्डेमय रस्त्यामुळे बैलगाडी घेऊन जाणेही अवघड बनले आहे, असे शेतकरी सांगत आहेत. पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये दूध संकलन केंद्रे आहेत. या दूधसंकलन केंद्रातील दूध जमा करण्यासाठी टेम्पो व इतर वाहने जातात. यापूर्वी कर्ले, बेळवट्टी या रस्त्यावरून सदर वाहनधारक ये-जा करीत होते. मात्र सध्या रस्ता धोकादायक बनला असल्यामुळे सदर टेम्पोमालक अन्य रस्त्यावरून ये- जा करीत आहेत. यामुळे त्यांना जादाचे पैसे मोजावे लागत आहे.

रस्ता डांबरीकरणाची मागणी

कर्ले ते बेळवट्टी हा सुमारे पाच ते साडेपाच किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. आम्हा स्थानिक लोकांसाठी कर्लेमार्गे बेळगावला येण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. मागील पाच वर्षांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसात रस्त्याचा बराच भाग वाहून गेला. तेव्हापासून काही ठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेलेच आहेत. या रस्त्यावरून वाहतूक करणे जोखमीचे ठरत आहेत. प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्यासाठी सरकारची योजना का राबविली जात नाही? हा रस्ता शेतकरी, विद्यार्थी व वाहनधारकांसाठी महत्त्वाचा असल्याने या रस्त्यांचे डांबरीकरण त्वरित करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

- कल्लाप्पा सुतार, बेळवट्टी

Advertisement
Tags :

.