स्वारगेटमध्ये घडलं तसं साताऱ्यात व्हायला नको.. !
सातारा :
स्वारगेट बसस्थानकात फलटणला येणाऱ्या २६ वर्षाच्या युवतीवर दत्तात्रय गाडे या नराधमाने शिवशाही बसमध्ये अतिप्रसंग केल्याच्या घटनेने राज्य ढवळून निघाले आहे. स्वारगेटमध्ये प्रवासी युवतीवर उभ्या असलेल्या बसमध्ये अत्याचाराची घटना घडल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. असे असताना सातारा जिल्ह्यातील अकरा आगारामध्ये असे प्रकार घडू नयेत, यासाठी नेमकी अकरा आगारात सुरक्षा कशी घेतली जाते?, असलेली सीसीटीव्ही यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे तर सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा बेभवशांची आहे. त्यामुळे एसटीचे प्रशासनाने महिला प्रवाशांसह एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी खेळू नये असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्रात आधीच सतत कायदा व सुव्यवस्थेवर सत्ताधारी रडारवर आहेत. बीडचे मस्साजोग प्रकरण अजूनही सुरु आहे. त्यातच सकाळीच स्वारगेट बसस्थानकात फलटण येथील युवतीवर दत्तात्रय गाडे नामक नराधमाने शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्यावरुन पुण्यात स्वारगेट परिसरात तणाव निर्माण झाला. स्वारगेट आणि सातारा हे दररोजचे सातारकरांचे प्रवासाचे माध्यम आहे. स्वारगेट बसस्थानकात फलटणची बस लागल्याची सांगत दत्तात्रय गाहे याने युवतीवर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे साताऱ्यात सुद्धा असे प्रकार एसटी आगारात घडू नये याकरता एसटी प्रशासनाकडून नेमक्या काय उपाययोजना होत आहेत की सुरक्षेच्या यंत्रणेला एसटीच्या यंत्रणेकडून वाळवी लागली. सातारा आगारात काही नादुरुस्त बसेस या सेव्हन स्टारच्या बाजूला उभ्या केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सीसीटीव्हीडी नसतो. तसेच काही बसेस या फलाट नंबर सातच्या पुढे नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. त्याचबरोबर कशाही कुठेही बसेस लागतात. त्यामुळे बस कुठे लागती आणि जाते कधी हे प्रवाशांना कळेपर्यंत ती मार्गस्थ झालेली असते. त्याचबरोबर बसस्थानकातील पोलीस चौकी पूर्वी इतकी अॅक्टीव्ह राहिली नाही. पुर्वीचे पोलीस जवान हे सतत फिरते असायचे. गस्त घालत असायचे. परंतु आताचे किती वेळ त्या पोलीस चौकीत असतात हा संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील इतर आगारात सुद्धा हीच तडा असून जिथे एसटीच्या महिला कर्मचारी याच सुरक्षीत नाहीत तिथे प्रवाशांचे काय?,
एसटीमध्ये सुरक्षा रक्षक असलेल्यांनाही एवढे राईट्स नसल्योन तेही एसटी स्टॅण्डचे गेट सोडून इकडे तिकडे जात नाहीत. त्यामुळे सातारचे विभागीय नियंत्रक रोहन पलंगे हे सातारा जिल्ह्यातील ११ आगारातील सुरक्षेच्यादृष्टीने आढावा घेणार काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.
- साताऱ्यात रस्त्यावर उतरणारे उरले नाहीत
सर्वसामान्याच्या प्रश्नांवर सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या संघटनांच्या तलवारी साताऱ्यात म्यान झालेल्या आहेत. काही मुठभर संघटना दररोज तेच तेच घिसेपिठे मुद्दे घेवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु कर्नाटकमध्ये मराठी चालक, वाहकाला मारहाण झाल्यानंतर साताऱ्यांतील संघटना शांत, यासह स्वारगेट बसस्थानकातील फलटणच्या युवतीवर अत्याचाराच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांनीही चुप्पी साधली आहे. त्यामुळे साताऱ्यात सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारे कोणीही राहिले नाही, अशीच चर्चा सुरु आहे.
- सुमारे दहा वर्षांपूर्वीच्या घटनेची झाली आठवण
सुमारे दहा वर्षापूर्वी सातारा बसस्थानक एक युवती आपल्या वडिलांसमवेत वाईकडे जाणाऱ्या बसची वाट पहात होती. यावेळी त्यांना एक जीप चालक भेटला असता त्याने मी तिकडेच निघालो आहे. आता बस नाही त्यामुळे तुम्हाला मी सोडतो असे सांगितले. यावेळी युवती व तिचे वडील त्याच्याबरोबर गेले. यावेळी ही जीप नागेवाडीजवळ गेल्यावर संबंधित चालकाने युवतीच्या वडिलांना मागचा दरवाजा वाजत आहे, उघडा आहे का बघा म्हणून बघायला लावले, ते गाडीतून उतरुन दरवाजा लावायला गेले असता त्यांना तिथेच सोडून युवतीला शिरगाव घाटात नेहून तिच्यावर अत्याचार केला होता.