For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपण बैठकीसाठी नव्हे, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो होतो : सभापती

04:25 PM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आपण बैठकीसाठी नव्हे  मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो होतो   सभापती
Advertisement

मडगाव : आपण पुढील दोन दिवस गोव्याबाहेर जात असून आपल्याला दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करायची होती. म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नसल्याची प्रतिक्रिया सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे. सरकारच्या बैठकीच्या ठिकाणी सभापती रमेश तवडकर यांनी उपस्थिती लावल्याने गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी जोरदार टीका केली आहे. सभापतींच्या भूमिकेबद्दलही त्यांनी शंका उपस्थित केली. सभापती जर अशा प्रकारे बैठकीला उपस्थित रहात असेल तर विरोधकांना न्याय कसा मिळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

या संदर्भात सभापती तवडकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आपल्याला मुख्यमंत्र्यांना दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटायचे होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ती बैठक संपल्यानंतर जेवण्याच्यावेळी भेटण्यास सांगितले. त्याप्रमणे आपण दुपारी 2 च्या नंतरच पणजीत पोचलो व मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा केली. आपण विधानसभा अधिवेशनाच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित नव्हतो. सकाळी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा काणकोणमध्ये कार्यक्रम होता आणि आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. काणकोणमधून आपण दुपारी 12.30 च्या नंतर बाहेर पडलो व मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पणजीला गेलो. मात्र, या विषयांवरून विनाकारण राजकारण केले जात असल्याचे सभापती म्हणाले.

घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन : अमित पाटकर

सभापती रमेश तवडकर यांनी भाजपच्या विधानसभा अधिवेशनाच्या तयारीच्या बैठकीला उपस्थित राहून घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन केले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. कोणत्याही राजकीय पक्षाच्या रणनीती बैठकीला सभापतींची उपस्थिती ही संविधानाच्या विरोधात आहे. सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करणारे असतात, केवळ एका पक्षाच्या बैठकीत सहभागी होणे म्हणजे निष्पक्षतेला धक्का देणारी कृती आहे. त्यामुळे लोकशाहीच्या प्रक्रिया आणि कार्यपद्धतीवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. ही कृती सत्ताधाऱ्यांकडून घटनात्मक पदांचा वापर पक्षीय फायद्यासाठी करण्याचा धोकादायक पायंडा असल्याचा दावाही पाटकर यांनी केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.