For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपल्या जीवनशैलीतून आपल्याला कोकण जपता आले पाहिजे - प्रसाद गावडे

11:48 AM Apr 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आपल्या जीवनशैलीतून आपल्याला कोकण जपता आले पाहिजे   प्रसाद गावडे
Advertisement

सावंतवाडी येथे शाश्वत कोकण परिषद संपन्न

Advertisement

सावंतवाडी : आपल्या जीवनशैलीतून आपल्याला कोकण जपता आले पाहिजे. आपल्या कोकणात येणारे विनाशकारी प्रकल्प रोखण्यासाठी कोकणातील युवकांनी एकत्र यायला हवे. कोकणाला बुद्धिमत्तेचा , विचारांचा वारसा लाभला आहे . कोकणातल्या युवकांची बुद्धिमत्ताही प्रचंड आहे . परंतु आजचा युवक जेव्हा राजकारण्यांच्या मागे धावत आपला वेळ वाया घालवताना दिसतो तेव्हा वाईट वाटते असे प्रतिपादन प्रसिद्ध युट्युबर कोकणी रानमाणूस यांनी सावंतवाडी येथे केले. संघर्षाकडून समृद्धीकडे ही टॅगलाईन वापरून शाश्वत कोकण परिषदेचे आयोजन सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 .30ते 1.30 या वेळेत करण्यात आले होते. या परिषदेत बारसु आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेले पर्यावरण अभ्यासक सत्यजित चव्हाण तसेच मल्हार इंदुलकर , मंगेश चव्हाण ,शशी सोनावणे, यांनी देखील आपले मत व्यक्त केले.

गावडे पुढे म्हणाले की , कोकण हे जगातील आजच्या घडीचं जगण्यासाठी बेस्ट प्लेस आहे. केवळ आजी आजोबांचे कोकण आपल्याला ठेवायचं नाही. शेवटची पिढी ही सहानुभूती घेऊन कोकण वाचवायचं नाही. जी तरुण पिढी आता आहे तीच नवी पिढी आहे . शेवटच्या पिढीतील जीवनशैली आपल्याला स्वतःत उतरविली तरच शाश्वततेकडे जाऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने होत असलेला विकास डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे. आपण वेडे बनता नये, स्वार्थी बनता नये. आपण फक्त माझा मी शाश्वत जगतो या मानसिकतेत राहता काम नये. आपल्या आजूबाजूचे कोकण जोपर्यंत उध्वस्त होत आहे तोपर्यंत आपण शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही . त्यासाठी पहिल्यांदा आपल्या आजूबाजूच्या देवराई जपल्या गेल्या पाहिजेत . कोकणामध्ये येणारे जे विनाशकारी प्रकल्प असतील ते थांबवण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. म्हणूनच कोकणची लोक संस्कृती, जीवनशैली बाबत जनजागृती करणारे कार्यक्रम भविष्यात या माध्यमातून राबवले जातील असा मानस प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केला .

Advertisement

कोकणवर प्रेम करणारा माणूस आणि त्याची अस्मिता निर्माण करणे हे शाश्वत कोकण परिषदेचं उद्दिष्ट आहे. कोकणला काय नको, काय हवं याची स्पष्ट कल्पना हवी. जैतापूर, रिफायनरी, विनाशकारी प्रकल्प नको. तर समृद्धी कशी पाहिजे याचा विचार या माध्यमातून करतोय. कोकणी माणूस प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतोय यापेक्षा आपल्याला कोणते प्रकल्प हवेत ही भूमिका असली पाहिजे. निसर्ग वाचवायचाय, कोकणसाठी वेगळे धोरण पाहिजे पण काँक्रिटीकरण, रस्ते असला विकास नको. निसर्ग राखायला हवा. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी हवी. केवळ राजकारणी , उद्योजक यांना जो विकास हवाय तोच विकास न होता सामान्य लोकांना पटणारा विकास झाला तर लोकशाही टिकायला मदत होईल. सिंधुदुर्गातील पर्यावरणीय सोडवण्यासाठी सामान्य जनतेने जागरूक राहायला हवे असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक आणि कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी येथे केले .

काय नाकारायचे, काय स्वीकारायचे आणि काय जतन करायचे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी महत्त्वाच्या आहेत, त्या राबविण्याची प्रकिया म्हणजे शाश्वत कोकण परिषद असं मला वाटतं. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट क्रायसिस हे मानवनिर्मित आहेत, त्यापेक्षा भांडवली व्यवस्थेने दिलेले आहेत. हे ज्यांना समजतंय ते जाणीवपूर्वक नाकारतायत. त्या लढ्याचा आपण सर्वजण भाग आहोत. हा झाला नाकारण्याचा भाग. कोकणातले सर्वच जिल्हे घ्या, यात पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत अख्खा पट्टा मुंबईसह पकडला तर सागरी, डोंगरी आणि नागरी असे क्षेत्र. यामध्ये आपण सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहोत, हे आपल्याला जेवढे जाणवतं तेवढं पॉलिसी मेकर्सना जाणवत नाही. किंबहुना त्यांच्या दृष्टीने हे सर्व रिसोर्सेस आहेत. त्यांनी माणसाचा सुद्धा रिसोर्स करून टाकलाय. त्याला तुम्ही हद्दपार केलंच पाहिजे. ‘विकासाची दृष्टी उफराटी’ हे आपण मान्य केलं पाहिजे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत ‘विकास वेडा झाला’ अशी घोषणा देण्यात आली होती त्याप्रमाणे आता खरोखरच विकास वेडा झालाय हे आपण स्वीकारलं पाहिजे. हा वेडेपणा मान्य केला तर त्यावर उपाय करून त्याला मार्गावर आणता येते. मात्र माझी लाईन बरोबरच आहे मी सरळमार्गी असं म्हटलं तर त्याचे उत्तर शोधता येत नाही. आतापर्यंत राबवण्यात आलेली विकासाची धोरणं ती सर्वच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारी आहेत. स्थानिक निसर्गाला उद्ध्वस्त करणारी आहेत. मुंबई गोवा हायवे झाला, चिंता वाढली. कोकण रेल्वे आली, चिंता वाढली. गैरसोय परवडली पण ही सोय नको असं म्हणायची पाळी आली. अशावेळी व्यापक दृष्टिकोन ठेवून समृद्धीचा विचार करावा लागेल. आपल्याकडे बरंच काही आहे पण आपल्याला ते समजलं नाही, ही आपली समस्या आहे. आंदोलनातून आपण आतापर्यंत खूप गाऱ्हाणी मांडली. आता गाऱ्हाणं नको. विनाशकारी प्रकल्प येऊच देणार नाही. आमच्या भागात बनूच देणार नाही या भूमिकेत आपल्याला राहावं लागेल. आमच्या विकासाच्या वाटा आम्ही चालू आणि जेव्हा लोक मिळून हे ठरवतात तेव्हा सर्वांगीण गोष्टी घडून येतात त्याचा दबाव पॉलिसी मेकर्सवर पडतो. पॉलिसी मेकर्स हे आपल्यातलेच असले पाहिजेत. नियोजन ठरवणारे, धोरण ठरवणारे हे हात आपल्यातलेच असले पाहिजेत असा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. आता कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. जो जो विनाशकारी प्रकल्प, विनाशनीती, या निसर्गाची हानी करणारे आपल्यावर लादले जातील. त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल. कायद्याची लढाई कायदेशीरपणे लढावीच लागेल याला पर्याय नाही आणि लढत असताना मग जे मुळात आमचं आहेच त्याचं जतन, संवर्धन आणि विकास हे समांतरपणे आपल्याला करावे लागेल. त्यामुळे झेंडा घेऊन आंदोलन करणारा कार्यकर्ता ही हवा आणि शांतपणे अदृश्य राहून काम करणारे मोठा समूहही जोडीला हवा असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक शशी सोनावणे यांनी सावंतवाडी येथे केले .

Advertisement
Tags :

.