विकासासाठी स्थिर सरकार हवे : सुलक्षणा सावंत
भाजप महिला मोर्चा तर्फे ‘कमल मित्र’ नोंदणी सुरू
मडगाव : राज्यात किंवा केंद्रात स्थिर सरकार हे विकासासाठी हवे असते. स्थिर सरकार असल्यास विकास जोमाने होत असतो. गोव्यात कार्यकर्त्याच्या बळावरच स्थिर सरकार प्राप्त झाले आहे. स्थिरता प्राप्त करण्यासाठी काही राजकारण करावे लागते व ते आम्ही केलेले आहे असे उद्गार सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी काढले. दक्षिण गोव भाजप कार्यालयात काल त्यांच्या हस्ते कमल मित्र नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्या दक्षिण गोव्यातील 20 मतदारसंघातील भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. आरती बांदोडकर, सरचिटणीस सौ. अनिता कवळेकर, दक्षिण गोवा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. परिमल सामंत, कृणाली मांद्रेकर उपस्थित होत्या. केंद्रात भाजपचे सरकार असल्यास पावणे दहा वर्षे झाली. गोव्यात भाजप सरकार बाराव्या वर्षात पर्दापण करीत आहे. सरकारचे विविध उपक्रम व योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे व त्याच्या बदलत्यात लोकांकडून आम्हाला प्रेम मिळाले आहे. हेच प्रेम मतांमध्ये रूपांतर होत असते.
स्व. मनोहर पर्रीकर यांनी लावलेली मूर्तीमेढ आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. एकेकाळी अवघेच कार्यकर्ते कार्यरत होते. आज कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली आहे व सर्वजण पक्षासाठी कार्य करीत आहेत. कार्यकर्त्याची संख्या वाढल्याने कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. जेणेकरून बऱ्याच गोष्टी साध्य करणे शक्य होत असते. त्याच बरोबर सत्येत असल्याचा माज असू नये असे सुलक्षणा सावंत पुढे बोलताना म्हणाल्या. सर्व सामान्य लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजनाची माहिती पोहचली पाहिजे. प्रत्येकासाठी घर, वीज, पाणी, सुलभ शौचालय, हेल्थ कार्ड या सुविधा बरोबरच महिला आणि बाल कल्याण खात्याच्या योजना तसेच पशुवैद्यकीय, मच्छिमार व कृषी खाते यांच्या जेव्हढ्या योजना आहेत. त्या सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. स्वंयपूर्ण मित्रामार्फत या योजना पोहचत असल्या तरी भाजपच्या महिला मोर्चाने कमल दूत होऊन याकामी पुढाकार घ्यावा असे सौ. सावंत म्हणाल्या. स्वंयपूर्ण ई-बाजारमध्ये महिलांनी नोंदणी करावी व आपली उत्पादने त्यासाठी विक्रीसाठी द्यावीत असे ही आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला सौ. आरती बांदोडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ. परिमल सावंत यांनी ‘कमल मित्र’ नोंदणीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृणाली मांद्रेकर यांनी केले.