‘एसी’त बसून खुर्च्या ‘तापविणारे’ नकोत!
वनमंत्री विश्वजित राणे यांची कडक भूमिका : वन खात्यातील तीन घटनांमुळे झाले संतप्त
पणजी : राज्यात एकापाठोपाठ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी ब्लॅक पँथर आणि बिबट्याच्या झालेल्या मृत्यूमुळे व्यतिथ झालेले वनमंत्री विश्वजित राणे यांनी राज्यातील अकार्यक्षम वन अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. केवळ ‘एसी’ त बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गोव्याला गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांच्या निक्रियतेवर संताप व्यक्त केला आहे. हल्लीच्या काळात राज्याच्या वनखात्याच्या नावाला बट्टा लागण्यासारख्या तीन घटना वनमंत्र्यांच्या नजरेस आल्या. त्यात एका अधिकाऱ्याने स्वत:च निर्णय घेताना बोंडला प्राणीसंग्रहालय अचानक बंद केले होते. त्यावरून वनमंत्री आधीच भडकलेले असतानाच दोन दिवसांपूर्वीच कोने प्रियोळ येथे एक ब्लॅक पँथर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात गाडीला धडकल्याने गंभीर जखमी झाला होता. वनसंरक्षक या नात्याने नवीन कुमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्याची पाहणी करणे क्रमप्राप्त होते. परंतु त्यांच्या निक्रियतेमुळे त्या पँथरला वाचविण्यात अपयश आले होते. ही घटना ताजी असतानाच सांगे भागात एक बिबट्या भर लोकवस्तीत फिरत असल्याचे दिसून आले होते. तो बिबट्या जखमी असल्याने लोकवस्तीत आला होता. तशाच परिस्थितीत तो एका घरात शिरला. मात्र सुदैवाने त्याने कुणावरही हल्ला केला नाही.
त्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांतून त्याला पकडणे शक्य झाले व तेथून त्याला बोंडला प्राणीसंग्रहालयात पाठविण्यात आले. खरे तर ही घटना समजल्यानंतर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी बोंडला प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन जखमी बिबट्याची काळजी घेणे क्रमप्राप्त होते. परंतु यावेळी त्यांनी अकार्यक्षमताच दर्शविली व परिणामी त्या बिबट्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे या अधिकाऱ्यांनी बोंडलामध्ये भेट देण्याचे सौजन्य न दाखविणे, जखमी बिबट्याची काळजी घेण्यात असमर्थता दर्शविणे, हे प्रकार म्हणजे त्यांच्या निक्रियतेचे स्पष्ट उदाहरण आहे, असे राणे यांनी नमूद केले. त्यामुळे अशा निक्रिय अधिकाऱ्यांना गोव्यात ठेवण्याची गरज नाही. वन्यजीव संवर्धन हा सरकारचा प्राधान्यक्रम असून या दिशेने सकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्हाला गरज आहे. या सर्व घटना आणि प्रकार पाहता राज्याला पशुवैद्यकीय आणि वन्यजीव देखभालीसाठी अत्याधुनिक सेवांची गरज व्यक्त करून त्यासंदर्भात प्रस्ताव मांडला असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. नुकत्याच मृत्युमुखी पडलेल्या ब्लॅक पँथरची डीएनए तपासणी तसेच बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याशिवाय वन्यजीवांचा वावर असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर गतीरोधक बसविण्याच्या सूचना केल्या आहेत.
वनसंरक्षकांना पदमुक्त करण्यासंबंधी डीजींना पत्र
या पार्श्वभूमीवर आता मंत्र्यांनी वनसंरक्षक नवीन कुमार यांना पदमुक्त करण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र डीजी फॉरेस्ट यांना पाठविण्यात आले आहे. राज्याच्या हिताआड काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची गय करण्यात येणार नाही. गोव्याला त्यांची गरजही नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.