खानापूर-कित्तूरमधील 166 गावांना बहुग्राम योजनेंतर्गत पाणीपुरवठा
वार्ताहर/नंदगड
ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याच्या अंतर्गत शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या बहुग्राम योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. नंदगड येथे 2 लाख 25 हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात येणार आहे. या जलकुंभ उभारणीच्या भूमिपूजनाचा समारंभ मंगळवारी पार पडला. या योजनेंतर्गत खानापूर व कित्तूर तालुक्यातील 166 गावांना पाण्याचा पुरवठा होणार आहे. यावेळी नंदगड एनआरई सोसायटीचे चेअरमन सी. जी. वाली व संचालक पी. के. पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर पायाखोदाई पार पडला.
यावेळी नंदगड ग्रा. पं.चे अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्षा संगीता मड्डीमणी, सदस्य नागेंद्र पाटील, संदीप पारिश्वाडकर, मन्सूर ताशिलदार, एम. एम. काजी, लक्ष्मण बोटेकर, राजेंद्र कब्बूर, विजय अरगावी, सुधीर कब्बूर, प्रोजेक्ट को ऑर्डीनेटर माधव चौगुले आदींसह ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. देगाव बहुग्राम योजना व कित्तूर तालुक्यातील इतर 16 गावे, कित्तूर शहर तसेच खानापूर तालुक्यातील 104 गावांसाठी बहुग्राम योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नविलतिर्थ डॅमजवळील शिंगारकोप-बुदरकोटी येथून नदीचे पाणी पाईपद्वारे बेळवडी, करीकट्टीहून कित्तूर येथे आणण्यात येणार आहे.
कित्तूर, बसरकोड येथे 40 लाख लिटर पाणी फिल्टर पॉईंटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथून नऊ विभागातील 166 गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. होन्नापूर, तिगडोळी, इटगी, बिडी, भाग्यनगर, बंकी, नंदगड, दोड्डहोसूर, बिदरभावी आदी नऊ विभागांचा यामध्ये समावेश आहे. नंदगड झोन (विभाग) येथे 60 फूट उंचीची 2 लाख 25 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी (जलकुंभ) उभारणार आहे. तेथून नंदगड, कसबा नंदगड, चन्नेवाडी, नरसेवाडी, भुत्तेवाडी, दोड्डेबैल, सागरे, हलशी, मेंढेगाळी, हत्तरवाड, किरहलशी, हलगा, बस्तवाड, मेरडा, करजगी, हेब्बाळ, नावगे, कारलगा, लालवाडी, जळगे, करंबळ, कौंदल, रुमेवाडी आदी एकूण 29 गावात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीना पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. हे पाणी गावातील नळपाणी योजनेंतर्गत जनतेला पोहोचविले जाणार आहे.