शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
आठ दिवसाआड पाणी : नागरिकांसमोर समस्या
बेळगाव : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे ऐन उन्हाळ्यात हाल होऊ लागले आहेत. काही भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. विजयनगर, विनायकनगर परिसरात मागील आठ दिवसांत पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरू झाला आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत राकसकोप आणि हिडकल जलाशयाची पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीसमस्या निर्माण होणार नाही, असा दावाही एलअॅण्डटीने केला आहे.
मात्र प्रत्यक्षात शहरात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पाण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी घातली जात आहे. यासाठी रस्त्यांवर खोदाई केली आहे. या कामामुळे जलवाहिनींना गळती लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. काही भागात पाणी सोडणे अडचणीचे ठरू लागले आहे. शहरांतर्गत विविध गल्ल्यांमध्ये 24 तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाई सुरू आहे. त्यामुळे सातत्याने पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. आधीच उन्हाळ्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यातच वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत.