जिल्ह्यातील 100 गावांमध्ये पाणीटंचाई
136 टँकरने पाणीपुरवठा : तीन ठिकाणी चारा बँक : सर्व 15 तालुके दुष्काळग्रस्त : जिल्हा प्रशासनाची माहिती
बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात पाणीटंचाई व चाराटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 12 तालुक्यातील 100 गावांना 136 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तर तीन ठिकाणी चारा बँक प्रारंभ करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण घटल्याने जिल्ह्यातील सर्व 15 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सरकारच्या सूचनेनुसार आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी विविध टप्प्यात सभा घेऊन नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 350131 शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई म्हणून 65.18 कोटी निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वर्ग करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पाणी समस्या गंभीर बनली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी 1333 कूपनलिका निश्चित करून 473 कूपनलिका मालकांशी करार करून त्या कूपनलिकांचे पाणी वापरण्यात येत आहे.
तीन ठिकाणी चारा बँक सुरू
जिल्ह्यामध्ये जनावरांसाठी चाराटंचाई होऊ नये यासाठीही दखल घेण्यात आली आहे. सध्या 1336452 टन चारा उपलब्ध आहे. 21 आठवडे हा चारा पुरू शकतो. तर शेतकऱ्यांना चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी 36900 बियाणांचे कीट वितरण करण्यात आले आहेत. पात्रताधारक 14 हजार 414 शेतकऱ्यांना हे कीट वितरित करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी चारा बँक सुरू करण्यात आली आहे. अथणी तालुक्यातील कक्कमरी व अनंतपूर, तर चिकोडी तालुक्यातील बेलकुड येथे चारा बँक सुरू करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने पत्रकाद्वारे कळविले आहे.
तालुक्यानुसार पाणीटंचाई निर्माण झालेली गावे
अथणी 38, बैलहोंगल 10, बेळगाव 8, रायबाग 24, मुडलगी 3, चिकोडी 8, रामदुर्ग 3, हुक्केरी 2, खानापूर, कित्तूर, सौंदत्ती, गोकाक येथील प्रत्येकी 1 गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.