राज्यावर पाणी टंचाईचे सावट
कडक उन्हाळ्यामुळे महाराष्ट्रात जवळपास 16 जिह्यांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. गतवर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने यंदा पाण्याबाबत महाराष्ट्र चिंतामुक्त असेल असे वाटत होते. मात्र उन्हाच्या तीव्र झळांनी फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन झाले. धरणातील पाणीसाठे आटले. पश्चिम महाराष्ट्राला याचा मोठा फटका बसेल. काही ठिकाणी फक्त 10 टक्के साठा राहील, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ होरपळतोय. कोकणात देखील टँकर सुरू झाले आहेत. ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, त्यासाठी छावण्या उभ्या कराव्या लागणार आहेत. सरकारसमोर हे मोठे आव्हान असेल.
सरकारपुढे अचानक कोणती आव्हाने उभी राहतील याचा नेम नसतो. काश्मिरात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांनाही आपले प्राण गमवावे लागले. त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना व अडकून पडलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्याचे आव्हान उभे राहिले. संकट समयी सर्वात आधी धावून जाण्याच्या आपल्या परंपरेला जोपासत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने काश्मीर गाठले. त्यांच्या पाठोपाठ राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनीही काश्मीर गाठले. या ठिकाणी मदत कार्य कसे सुरु आहे याची माहिती एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील हे दोन मंत्री देत होते. लोकांना महाराष्ट्रात पाठवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र दुर्दैवाने या सर्व प्रकाराला सत्ता स्पर्धेच्या दृष्टीने पाहिले गेले. त्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे अशा पद्धतीने सरकारातील या मंडळींचे वर्तन होतेच. पण अशा संकटकाळी त्याची उघड वाच्यता होण्याची आवश्यकता नव्हती. असो, आता या संदर्भात मृतांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी आणि त्यांचे दु:ख जाणून घेण्यात नेते व्यस्त आहेत हे ही थोडके नाही. सामान्य माणसांच्या दु:खाचे सरकारलाच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षांना किती महत्त्व वाटते हे त्यातून अनुभवायला येणे सुद्धा जनतेच्या दृष्टीने दिलासादायकच. पण त्यानंतर विविध पक्षांच्या मंत्री, आमदार आणि इतर मंडळींची जी वक्तव्ये येत आहेत त्यांची आवश्यकता नाही. ही अवकाळी बाष्कळ बडबड सर्वपक्षीयांनी प्रयत्नपूर्वक थांबवण्याची गरज सर्वसामान्यांना वाटू लागली आहे.
धरणांच्या घटत्या पाणी पातळीची चिंता
उन्हाच्या तीव्रतेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये 41.30 टक्के इतकीच पाणी पातळी शिल्लक आहे. गेल्या महिनाभरात 32 प्रमुख धरणांमधील पाणी पातळी 18 टक्क्याने घटली आहे. एप्रिल शेवटचा आठवडा, मे पूर्ण आणि जूनचा पहिला आठवडा इतकाकाळ हा भाग टिकाव धरणार का? याची चिंता व्यक्त केली जात आहे. अलीकडच्या काळात पावसाळा जवळपास एक महिना पुढे गेला असल्याने जुलै महिन्यापर्यंत हे पाणी वाचवणे हे मोठे आव्हानाचे काम आहे. संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती बिघडत चालली आहे. विहिरी, तलाव आटत चालले असून बोअरचे पाणी अधिक खोलवर गेले आहे. त्यामुळे हे एक मोठे आव्हान बनणार आहे. प्राधान्याने सरकारला यावरच काम करावे लागेल असे दिसते.
पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकणावरही प्रभाव
वाढत्या तापमानाचा पश्चिम विदर्भातील पाच जिह्यांत जलसाठ्यांना मोठा फटका बसला आहे. 289 प्रकल्पात 35 टक्के पाणी साठा आहे. अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. चंद्रपूर शहरात 180 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अमरावती जिह्यातील चिखलदरा आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील सात गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. जिह्यातील 776 गावांसाठीच्या तातडीच्या उपायोजना साठा 50 टक्केवरच असल्याने नियोजन कोलमडले आहे. सलग तीन दिवस अमरावतीच्या तापमानात वाढ झाल्याने पाणी टंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमरावती जिह्यातील चिखलदराच्या पायथ्याशी गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. तर तलाव कोरडेठाक पडले आहेत. आदिवासींवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यवतमाळ जिह्यात 79 हजार नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. प्रशासनाकडून 57 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर जिह्यातील 330 गावात पाणीटंचाईचा फटका बसला आहे. इथल्या जिह्यांची स्थिती गंभीर आहे. ती अशी : अमरावती जिल्हा- 56 प्रकल्प, 46.29 टक्के जल साठा, 28 प्रकल्प कोरडे, टँकर पाणी पुरवठा संख्या 12. यवतमाळ जिल्हा 74 प्रकल्प, 32.97, टँकर संख्या 6. अकोला जिल्हा 30 प्रकल्प, 31.50. वाशिम जिल्हा 78 प्रकल्प,25.17 साठा. बुलढाणा जिल्हा 51 प्रकल्प,27.7 साठा, टँकर संख्या 31. अशाच पद्धतीने मराठवाड्याच्या पाचवीला तर दुष्काळच पुजलेला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात मराठवाड्यातील 20 लाख लोकसंख्या टँकरवर जगत होती.
यंदाची एप्रिल शेवटच्या आठवड्यातील टँकरची आकडेवारी अशी आहे : छत्रपती संभाजीनगर 742, जालना 513, परभणी 31, हिंगोली 10, नांदेड 39, बीड 436, लातूर 44, धाराशिव 123, मराठवाडा एकूण 1938. इथे जालना जिह्यातील 64 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले असून 24 प्रकल्पांमध्ये केवळ मृत साठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा अधिकच वाढत चालल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी झपाट्याने पाणी पातळी खाली जात आहे. कोकणात रत्नागिरी जिह्यात सुद्धा टँकर सुरू आहेत. उन्हाळ्यात इथली परिस्थिती सुद्धा गंभीर बनते. राज्याच्या सर्व भागात यंदा चांगला म्हणजे 105 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे. मात्र त्याचवेळी पावसाने वेळेवर येणे देखील अपेक्षित आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी आटण्याचे प्रमाण यंदाच्या वर्षी खूपच वाढले आहे. शिल्लक पाणीसाठा पुरवून वापरायचा म्हटले तरी सूर्य कोपला तर हे साठवलेले पाणी उडून जाण्याचा धोका आहे. निसर्गाचे हे गंभीर संकट बरेच काही सांगणारे आणि सरकारला अत्यंत नजीकच्या भविष्यकाळात याबाबतीत एक ठोस धोरण आखावे लागणार, हे स्पष्ट करणारे आहे. यासाठी झटपट कृती करावी लागणार आहे. विशेष म्हणजे हे करत असतानाच दिलासादायक योजना राबवून लोकांना त्यांच्या किमान गरजा भागतील इतपत व्यवस्थाही करावी लागणार आहे. हे खूप मोठे आव्हान आहे. सरकार याला लवकरात लवकर गांभीर्याने घेईल अशी आशा आहे.
शिवराज काटकर