मजगावात पंधरा दिवसाआड पाणी
पाण्याची गंभीर समस्या : रात्रंदिवस भटकंती : नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : पुरवठा सुरळीत करा
वार्ताहर /मजगाव
शहर प्रभाग क्रमांक 58 मजगाव येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मजगावला महानगरपालिकेचा नळपाणी पुरवठा आहे. परंतु पंधरा दिवसातून एकदा नळाला पाणी येते. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती सुरू आहे. मजगाव परिसरात मुबलक पाणीसाठी आहे. गल्लोगल्ली बोअरवेल आहेत. पण 75 टक्के बोअरवेल निकामी झाल्या आहेत. कारण टँकद्वारे शहराला व औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारे खासगी वॉटर सप्लायर्सची संख्या वाढली आहे. सध्या रात्रंदिवस पाण्याचा उपसा सुरू असल्याने मजगावात कृत्रिम पाणी टंचाई उद्भवली आहे. एक टँकर पाण्याचा भाव हजार रुपये झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर पाण्याच्या उपसामुळे जलपातळी खालावली आहे. सुमारे 200 फूट हूनही अधिक खोलीचे बोअरवेल निकामी झाले आहेत. त्यामुळे गावची दोन्ही भलीमोठी तलावे रिकामी झाली आहेत. गावातील सर्व विहिरी कोरड्या झाल्या आहेत. मजगावच्या पश्चिमेस ‘सावरी तलाव’ सुमारे पंधरा एकरमध्ये व्यापलेला आहे. पण गेल्या दहावर्षात दोनवेळा खोदाईच्या नावावर लाखो खर्चून सर्व काम अर्धवट केले. खोलीतर नाहीच फक्त धुळफेक केल्याचे निदर्शनास येते. सावरी तलावाची खोली दहा फूट जर वाढवली तर संपूर्ण गावातील विहिरीं जिवंत होतील अशी परिस्थिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून दोन्ही तलावांची खोली वाढवली तरच गावची पाण्याची समस्या सुटेल अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. मजगावचा शहरात समावेश होऊन सुमारे 60 वर्षे झाली पण अनेक सुविधापासून वंचित आहे. या गावची गायरान जमीन औद्योगिक वसाहतीला देण्यात आली आणि गाव जनावरे पाळण्यास मुकले. औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी गावातूनच बाहेर जाते. त्यामुळे गावातील सर्व विहिरी दूषित झाल्या आहेत. गावातील 90 टक्याहून अधिक विहिरी कोरड्या झाल्या आहेत. शिवाय ‘मजगावात ड्रेनेज’ची सोय नाही. त्यामुळे गावात प्रत्येकवर्षी सांसर्गिक आजाराना सामोरे जावे लागते.
अन्यथा मनपावर घागर मोर्चाचा इशारा
24 तास पाणीपुरवठ्यासाठी गावात पाईपलाईन घातलेली आहे. मात्र अद्याप कनेक्शन दिलेले नाही. तरी महानगर पालिकेने त्वरित नळ कनेक्शन जोडावीत अन्यथा संपूर्ण गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा. तसेच गावातील सर्व बोअरवेलची खोली वाढवून निकामी बोअरवेल दुरूस्त कराव्यात. अन्यथा संपूर्ण गावातर्फे घागर मोर्चा महानगरपालिकेवर काढण्यात येईल असा इशारा दिला.
- पंच, शिवाजी पट्टण