‘हिडकल’मधून घटप्रभा उजवा कालवा, चिकोडी उप कालव्यात पाणी
21 पासून कार्यवाही; 11 डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार
बेळगाव : 2025- 26 मधील रब्बी हंगामात पिकांसाठी पाणलोट क्षेत्रातील पिकांसाठी हिडकल धरणातून घटप्रभा उजवा कालवा व चिकोडी उपकालव्यात हिडकल धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती हिडकल धरणाचे अधीक्षक अभियंता एम. एल. गणी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सुचनेवरून 21 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत हंगामातील पिकांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. घटप्रभा उजवा कालव्याच्या पाणलोट प्रदेशाला कालव्याच्या शेवटपर्यंत पाणी पोचविण्यात येईल.
बागलकोट एमबीसी विभाग 1 कालव्यात 21 ते 30 नोव्हेंबरपर्यंत, कौजलगी जीआरबीसीसी विभाग 5 कालव्यात 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत व गोकाक जीआरबीसीसी विभाग 3 कालव्यात 6 ते 11 डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व एस्केप गेट रब्बी हंगाम पूर्ण होईतोवर पूर्णपणे बंद करावेत व पाणीपुरवठा करण्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्या विभागातील सर्व वितरण कालव्यांचे गेट बंद करण्याची सूचना संबंधित अभियंत्यांना करण्यात आली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
रब्बी हंगामासाठी पाणीपुरवठा करण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय आपले स्थळ सोडू नये, कालव्यामार्फत सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत सुरळीतपणे पोचवावे. पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांकडून काही तक्रारी आल्यास त्याला सर्वस्वी अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारही देण्यात आला असल्याचे अधीक्षक अभिय़ंता गणी यांनी म्हटले आहे,