उचगाव मठ गल्लीतील घरांमध्ये शिरले पाणी
गटारी बुजल्याने समस्या : ग्रा. पं.ने त्वरित दखल घेतल्याने समाधान
वार्ताहर /उचगाव
उचगाव-गोजगे मार्गावरील मठ गल्ली येथील रस्त्याच्या दुतर्फा गटारी बुजलेल्या असल्याने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अनेक घरांतून शिरून नुकसान झाले होते. याची दखल उचगाव ग्रा. पं.ने तातडीने घेऊन गटारींची स्वच्छता तसेच सिमेंट पाईप घालून या भागातून येणारा मोठा पाण्याचा लोंढा बाहेर काढण्यात आला आहे. यामुळे मठ गल्लीतील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मठ गल्ली गोजगे रोड भागामध्ये माळजमिनीतील पाण्याचा मोठा लोंढा येतो. याचा सातत्याने या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सदर पाणी पुढे तलावाला जाऊन मिळते. मात्र या पाण्याला जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने तसेच सर्व गटारी बुजल्याने मुसळधार पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरून घरातील वस्तू खराब झाल्या आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
सदर पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायतीने तातडीने सिमेंट पाईप आणून या संपूर्ण भागात जिथे जिथे अत्यावश्यक आहे, अशा ठिकाणी, गटारीतून सिमेंट पाईप घालून या पाण्याचा निचरा करण्यात आला. उचगाव ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, माजी सदस्य कृष्णा नावगेकर, योगेश गिरी, संजय मण्णूरकर, राजू कणबरकर, ज्योतिबा नाईक, विठ्ठल नाईक, रघुनाथ लाळगे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर भागातील पाणी बाहेर गेल्याने आणि ग्रा. पं.ने तातडीने यावर उपाययोजना केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.