वॉरेन बफे : नवे पर्व
वयाच्या 11 व्या वर्षी गुंतवणूक श्री गणेशा करणारे व अब्जाधिशांच्या यादीत सातत्य टिकवणारे वॉरेन यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात विनोद, विद्वता यांचा अपूर्व मेळा दर्शवतात. त्यांचे गुंतवणूक विषयक धोरण, कंपनीची तत्व प्रणाली, मानवी भांडवलास असणारे महत्त्व, तंत्रज्ञानाचा वापर व आव्हाने याबाबत असणारी स्पष्ट मते पटतीलच असे नाही पण निश्चितपणे विचारप्रवर्तक ठरतात. आपल्या यशाचे गणित सहजपणे उगलडून सांगताना ‘बाजार’ हाच सर्वश्रेष्ठ आहे व आपण जर संयतपणे, निष्ठेने, दीर्घकालासाठी निर्णय घेतले तर ते यशस्वी ठरतात हे त्यांनी अधोरेखीत केले. त्यांचे विचार समजून घेतल्यास समृद्ध, संपन्न जीवनाचे रहस्य समजते.
गुंतवणूक धोरण
वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक धोरण पद्धतीमध्ये त्यांचे यश लपले असून अनेक अपयशी, दिवाळखोर, गुंतवणूकदार त्यांनी स्वीकारलेल्या बरोबर उलट वर्तन करीत असतात! यातूनच अति अल्प काळात प्रचंड मोठा परतावा देणाऱ्या फसव्या योजनांचा जन्म होतो. एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी निवडताना, लग्न ठरविताना ज्या प्रकारे तपशीलवार माहिती घेतली जाते. तशीच सविस्तर, सखोल माहिती घेणे आवश्यक असते. गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया असून संधीची वाट पाहणे व संधी मिळताच ताबडतोब निर्णय घेणे महत्त्वाचे असते. अनेकवेळा वाट पाहणेचा परतावा अधिक असतो! आपल्या गुंतवणूकीच्या 50 वर्षात फक्त 9 वेळा गुंतवणुक संधी मिळाल्याचे ते नमूद करतात.
याचाच अर्थ गुंतवणूक संधी 5 ते 7 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मिळते. सहनशीलता ही सर्वात मोठी गुणात्मक बाजू गुंतवणुकीत असावी लागते. प्रत्येक कंपनीचा ताळेबंद त्यासाठी महत्त्वाचे साधन ठरते. कंपनीच्या आकडेवारीत काय सांगितले, काय लपवले व काय सांगितले नाही या सर्वांचा आढावा घेतल्यानंतरच गुंतवणूक निर्णयाची वाट पहावी लागते. कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी निवडताना 5-10 किंवा 20 वर्षाचा कालावधी गृहीत धरून तिच्या संभाव्य फायद्याचा विचार करता येतो. या निकषावर बफे यांनी अमेरिकन एक्सप्रेस, कोका कोला, डिस्ने, जिलेट, अॅपल यासारख्या कंपन्यांची निवड केली. शेअर्सचा धारणा कालावधी ‘अमर्याद’ हेच सूत्र त्यांनी ठेवले.
शेअर बाजारात चढउतार नेहमीचे असतात. सर्वसाधारण गुंतवणूकदार बाजार वाढल्यानंतर गुंतवणूक करतात व थोडी घसरण झाली की नुकसान पत्करुन बाहेर पडतात. वॉरेन बफे यांनी पुढील 5 वर्षे शेअरबाजार बंद राहणार असे समजून शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीने 3 वेळा 50 टक्क्यांपर्यंत नुकसान पाहिले आहे व अशा काळातच गुंतवणूक वाढवून उत्तम परतावा मिळवला आहे. ज्यावेळी सर्व गुंतवणूकदार निराश असतात, बाजारात मोठी मंदी असते अशावेळी उत्तम मुल्याचे समभाग कमी किंमतीत घेणे हे सूत्र वापरणारेच श्रीमंत होतात. गुंतवणुकीबाबत भावना नियंत्रण, भर नियंत्रण व लोभ टाळणे यासाठी दीर्घकाळ गुंतवणूकच योग्य ठरते.
गुंतवणुकीचे दोन सुवर्ण नियम त्यांचे प्रसिद्ध असून, ‘पहिला नियम: पैसे कधीही घालवू नका. नियम दुसरा: पहिला नियम केव्हाही विसरु नका.’ आपली सर्व रोखता न गुंतवता उद्याच्या संधी करीता पुरेशी रोकड ठेवण्याचे धोरण नव्या संधीचा फायदा घेण्यास गरजेची असते. त्यामुळे 30 ते 50 टक्के रोखता बाळगणे योग्य ठरते. सर्वसाधारण कुटुंबे उत्पन्नातून खर्च वजा करता राहिलेली बचत गुंतवणुकीसाठी ठेवतात. यात बदल वॉरेन बफे यांनी सुचविला असून उत्पन्नातून प्रथम बचत बाजुला काढून उर्वरीत रक्कम खर्चासाठी घ्यावी, असे केल्याने शिस्तबद्ध गुंतवणूक होते. स्वत: अत्यंत साधेपणाने जीवन जगत त्यांनी उत्तम गुंतवणूकदार कसा असतो याचे उदाहरण दाखवून दिले. ज्या व्यवसायाची तुम्हाला माहिती आहे अशाच क्षेत्रात गुंतवणूक करा, कळप मानसिकता टाळा, अभ्यासपूर्वक गुंतवणूक करा व दीर्घकाळासाठी गुंतवा हे महत्त्वाचे गुंतवणूक धडे कायमचे दीपस्तंभ आहेत.
गुंतवणुकीपलीकडे...
पैसा हे सर्वस्व नसते. परंतु असे म्हणण्यापूर्वी भरपूर पैसा मिळवलेला असणे आवश्यक असते. (श्दहाब् ग्s हदू ानब्tप्ग्हु. ँल्t taत्क् sल्म्प् हदहाहा दfिाr स्aक्ग्हु त्दू द श्दहाब्.) या उक्तीनुसार वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीची वाढ उत्तम प्रकारे केली पण त्याचबरोबर 99 टक्के मालमत्ता ही समाजकार्यास देण्याचे दातृत्व दर्शवले. मानवी भांडवल, कंपनीतील लोक महत्त्वाचे असून जे कठोर परिश्रम करू इच्छितात. त्यांनी बर्कशायरमध्ये यावे, असा सल्ला तरुणांना दिला. तरुणांनी भरपूर वाचन करावे, उत्सुकता, नाविन्य, चिकित्सक विचार ठेवावेत. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्यांची मैत्री, सहवास ठेवला तरच तुम्ही चांगले होऊ शकता जर तसे नसेल तर उलट होऊ शकते, हा महत्त्वाचा संदेश त्यांनी तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिला. नूतन कार्यकारी संचालक ग्रेग अबेल आपल्यापेक्षा अधिक कस करणारे आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली बर्कशायर अधिक वेगाने वाढेल यावर विश्वास व्यक्त केला. आपण अतिशय संपन्न व मनाप्रमाणे जीवन जगू शकतो. इतरांच्या कंपनीत न आवडणारे काम कधीही करावे लागले नाही. याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आजही मी हवे ते पिण्यास मुक्त असल्याचा आनंद व्यक्त केला. बर्कशायरची शाश्वत मुल्ये सहनशीलता, एकाग्रता व स्वतंत्र विचारक्षमता असून ती कायमची राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
जागतिक घडामोडी
जागतिक स्तरावर होणारे राजकीय निर्णय, संशोधन दिशा व वापर चलनवाढ, राजकोषीय प्रश्न यावरही वॉरेन बफे यांनी भाष्य केले आहे. अमेरिकेच्या जकात धोरणास अप्रत्यक्ष विरोध करीत व्यापार हे शस्त्र नाही. इतर जग श्रीमंत झाले म्हणजे आपण गरीब होत नाही तर इतरांच्या प्रगतीने आपणही श्रीमंत व सुरक्षित होतो. वॉरेन बफे यांचे विधान व्यापारयुद्धाऐवजी सहकार्यावर भर देणारे आहे. चलनवाढ हे चलनमूल्य कमी करणे व चलनावरील विश्वास घटतो. सामाजिक स्थिरतेसाठी चलन स्थिरता महत्त्वाची ठरते. लोकशाही व भांडवलशाहीत सरकारची उत्पन्न व खर्चातील तूट किंवा राजकोषीय तूट दीर्घकाळात अडचणी निर्माण करणारी असल्याने त्यावर उपाय आवश्यक ठरतो.
उत्पादक व्यवस्था म्हणजे वस्तू व सेवा निर्माण करणारी रचना चिरेबंदी राजवाडा असते व कॅसिनो व्यवस्था फक्त पैसे हस्तांतरित करते. कॅसिनोचे महत्त्व उत्पादन व्यवस्थेपेक्षा अधिक होणे हे धोकादायक असते हा इशारा महत्त्वाचा आहे. आपल्या विद्वतपूर्ण, व्यावहारीक व विनोदी स्टाईलने वॉरेन बफे 50 वर्षाहून अधिक काळ सांभाळलेले पद ग्रेग अॅलेन यांच्याकडे संक्रमित करणार असले तरी मार्गदर्शक म्हणून वर्कशायरमध्ये असणार आहेत. नैतिक अधिष्ठान, अभ्यास, शिस्त व सातत्य यातून मोठ्या संस्था त्यामध्ये असणाऱ्या मानवी भांडवलानेच समृद्ध होतात, हे वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे दीपस्तंभाप्रमाणे आदर्श ठरते.
प्रा. विजय ककडे