भाजपविरोधात मतदान दोन्ही जागा जिंकणारच
‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांचा दावा
पणजी : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सरकार व भाजपविरोधात मतदान केले असून गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार असल्याचा दावा इंडि आघाडीतील घटक पक्षांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत हिच आघाडी कायम राहणार असल्याची खात्री त्या घटक पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. खाण पट्ट्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर जादा मतदान झाले असून ते भाजप सरकारच्या विरोधात गेल्याचे त्यानी सांगितले. पणजीतील काँग्रेस भवनमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, आपचे प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, तसेच आघाडीचे दक्षिण गोवा उमेदवार विरियतो फर्नांडिस, काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांची उपस्थिती होती. सर्वांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात आघाडीचे उमेदवार विजयी होणार असून भाजपला आता त्याचीच मोठी धास्ती वाटत आहे. या भीतीपोटीच मुख्यमंत्री डॉ. सावंत हे मडगावात तळ ठोकून होते. भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे हे अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाल्याचे सांगतात म्हणजेच त्यांनी देखील या मतदानाचा धसका घेतल्याचे दिसून येते, अशी टिपणी पाटकर यांनी केली. उत्तर गोव्यातील सर्व 20 विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडी घेणार असे डॉ. सावंत म्हणतात ते चुकीचे आहे. सावंत यांचा हा दावा खोटा ठरल्यास त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांचे म्हणणे खरे ठरले तर आपण राजकारण सोडतो असे खुले आव्हान आपचे अध्यक्ष पालेकर यांनी दिले.