गॅरंटी योजनांमुळे मतदारांचा काँग्रेसवर विश्वास
उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचे प्रतिपादन : यमकनमर्डी मतदारसंघात केला प्रचार
बेळगाव : राज्यात काँग्रेस सरकारकडून राबविण्यात आलेल्या गॅरंटी योजनांमुळे गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर मतदारांकडून विश्वास व्यक्त केला जात असून काँग्रेसला पूरक वातावरण आहे. मतदारांनी बहुमतांनी निवडून द्यावे, असे आवाहन उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील हागेदाळ आणि शिरूर गावांमध्ये प्रचार करून आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. गॅरंटी योजना राबवून राज्य सरकारने महिलांना आर्थिकरीत्या सबळ केले आहे. महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास महिलांसाठी विशेष गॅरंटी योजना जाहीर केली जाणार आहे, असे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी सांगितले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अनेक विकासकामे करून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या माध्यमातूनही गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजना राबवून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यात यावा, असे आवाहन प्रियांका जारकीहोळी यांनी केले. भाजप सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून बेरोजगारीचा प्रश्नही उभा ठाकला आहे. अनेक तरुण पदवीधर आहेत. मात्र, नोकरी नसल्याने ते बेरोजगार झाले आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी काँग्रेसलाच सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्राम पंचायत सदस्य, महिला संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.