भले शाब्बास! उत्तराखंडच्या मावळ्याकडून सदाशिवगड सर, सायकलवरुन प्रवास
सदाशिव परिवाराच्या वतीने स्वागत, वर्षभरात साडेतीनशे किल्ले सर करण्याची मोहीम
कराड : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने प्रेरित झालेल्या उत्तराखंडच्या मावळ्याने एक वर्षात साडेतीनशे गड-किल्ले सर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. उत्तराखंड ते महाराष्ट्र सायकलवर प्रवास करून १२८ दिवसांत तब्बल ४३ किल्ले सर करीत हा मावळा शनिवारी दुपारी किल्ले सदाशिवगडावर पोहोचला. यावेळी सदाशिव परिवाराच्या वतीने या मावळ्याचे स्वागत करण्यात आले.
उत्तराखंड येथील कार्तिक याने एक वर्षात सायकलवरून महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ले सर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिवनेरीपासून या मोहिमेस प्रारंभ झाला असून रायगडावर मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. कार्तिकने आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील पांडवगड, केंजळगड, कमळगड, बैराटगड, चंदन-वंदनगड, नांदगिरी, बर्धनगड, प्रतापगड, मकरंदगड, महिमंडणगड, वासोटा, सज्जनगड, अजिंक्यतारा आदी गड सर केले.
कार्तिक ज्या ज्या गडावर जाईल, तिथे स्थानिक मावळ्यांकडून कार्तिकचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी सदाशिवगड सर केल्यानंतर सदाशिव परिवाराच्या वतीने कार्तिकचे स्वागत करण्यात आले. यावेळी कृष्णत काळे, संदीप मुळीक, वैभव माने, सनी थोरात, उदय करडे, विलास माने, ओंकार कदम, श्रीधर माने, प्रीतम जाधव, प्रसाद ऐवळे, वैभव जाबीर, प्रसाद देठे, अनुज गायकवाड व मावळे उपस्थित होते. तसेच अलंकार उद्योग समूहाच्या वतीने कार्तिकचे स्वागत करीत दीपकशेठ आरबुणे यांच्या माध्यमातून शनिवारी हॉटेल अलंकार येथे त्याची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. रविवारी सकाळी कराड शहरातील भुईकोट किल्ला करून कार्तिक वसंतगडाकडे रवाना होणार आहे.