पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार
तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असताना पश्चिम बंगालमध्ये पुन्हा अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे. या टप्प्यात राज्याच्या चार मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. मुर्शिदाबाद, जांगीपूर, माल्दा उत्तर आणि माल्दा दक्षिण अशा चार मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान झाले. मुर्शिदाबाद आणि जांगीपूर या दोन जागांवर 2019 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. तर माल्दा उत्तर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले होते. काँग्रेसने माल्दा दक्षिण मतदारसंघ मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत या सर्व मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले असले तरी हिंसाचाराचे गालबोट 20 ठिकाणी लागले आहे. माल्दा दक्षिण मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये 3 ठिकाणी बाचाबाची झाली.
मुर्शिदाबाद मतदारसंघात चार मतदानकेंद्रांच्या बाहेर याच दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचे वृत्त आहे. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसकडून मुद्दाम घडवून आणला गेला असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. मतदारांच्या मनात भीती निर्माण करुन त्यांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न तृणमूलचे कार्यकर्ते करीत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि तृणमूल यांच्या कार्यकर्त्यांमध्येही वादंग होऊन दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. मतदान यंत्रावर हल्ला करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, तो सुरक्षा सैनिकांनी हाणून पाडला, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.