महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विदर्भचा कडवा प्रतिकार, मुंबईचा विजय लांबणीवर

06:58 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

करुण नायर, कर्णधार अक्षय वाडकरची अर्धशतके, चौथ्या दिवशी 5 बाद 248 धावांपर्यंत मजल

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

करुण नायर (74) आणि कर्णधार अक्षय वाडकर (नाबाद 56) यांच्या जोरावर विदर्भाने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे मुंबईची 42 व्या रणजी चषक विजेतेपदाची प्रतीक्षा लांबली आहे. पाहुण्या संघाने बुधवारी येथे अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 5 बाद 248 पर्यंत मजल मारली.

पहिल्या दिवसाच्या दुपारपासून वर्चस्व गाजवून मुंबईने सामना जिंकण्याच्या दृष्टीने अशक्यप्राय लक्ष्य समोर ठेवल्यानंतर विदर्भाने दिवसभर शर्थीची झुंज दिली आणि यजमानांना निराश करताना फलंदाजीत चांगले प्रदर्शन घडविले. या मोसमाच्या सुरुवातीला विदर्भाच्या संघात सामील झालेला नायर त्यांच्या प्रतिकारात आघाडीवर राहिला. त्याने तब्बल 220 चेंडूंचा सामना करून आणि 287 मिनिटे फलंदाजी करून मुंबईच्या योजना फळू दिल्या नाहीत. हा फलंदाज अखेरीस मुशिर खानच्या गोलंदाजीवर दिवसाच्या शेवटच्या सत्रात बळी पडला. 19 वर्षीय मुशिरने मुंबईच्या दुसऱ्या डावात 136 धावांची खेळी केल्यानंतर शानदार गोलंदाजीही केली.

 

विदर्भाचा कर्णधार वाडकर हा सध्या हर्ष दुबे (नाबाद 11) याच्यासह 56 धावांवर खेळत असून संघाला विजयासाठी आणखी 290 धावांची गरज आहे आणि पाच गडी शिल्लक राहिले आहेत. मुंबईने पहिल्या दोन सत्रात प्रत्येकी दोन बळी मिळविले आणि शेवटच्या सत्रात नायरसारखा महत्त्वाचा अडथळा दूर केला. डावाच्या 82 व्या षटकात त्यांनी दुसरा नवीन चेंडू घेतला. तोपर्यंत मुंबईने वानखेडे स्टेडियमच्या पाटा खेळपट्टीवर जवळपास सारे हातखंडे आजमावून पाहिले. मात्र यजमनांच्या फिरकीपटूंना या खेळपट्टीकडून जास्त मदत मिळाली आणि त्यांनी सातत्याने मारा केला.

मुंबईच्या वेगवान गोलंदाजीच्या त्रिकुटाने ‘राऊंड दि विकेट’ मारा करूनही पाहिला, तर फिरकीपटू दोन्ही बाजूंनी कार्यरत राहिले. मात्र अंतिम फेरीचे दडपण आणि 538 धावांचे असाध्य वाटणारे लक्ष्य समोर असूनही हार न मानता विदर्भाने जोरदार झुंज देऊन नैतिक विजय मिळवला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मुंबईच्या फिरकी माऱ्याचे नेतृत्व मुशिर खानने केले. त्याने 17 षटकांत तीन निर्धाव टाकून 24 धावांत 2 बळी मिळविले. 17-3-24-2 च्या आकड्यांमुळे जवळजवळ खेळू शकला नाही. दोन्ही बाजूंनी प्रभावी मारा करत त्याने विदर्भाच्या फलंदाजांना त्रास दिला.

 

यात मुशिरने नायरचा घेतलेला बळी लक्षणीय राहिला. नायरला चार धावांवर असताना जीवदान मिळून कोटियनच्या चेंडूवर हार्दिक तामोरेने त्याचा झेल सोडला होता. मुशिरने हा चेंडू झटपट आत वळविला. त्याने नायरच्या बचावाला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, परंतु या प्रसंगी चेंडूने बॅटची कड पकडली आणि तामोरेनेही तितक्याच तत्परतेने झेल पकडला. तनुष कोटियननेही 19 षटकांत 55 धावा देऊन 2 बळी घेत आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली. विदर्भाने दिवसाच्या सुरुवातीलाच आपला पवित्रा स्पष्ट केल्यानंतर त्याने ध्रुव शोरे (28) आणि यश राठोड (7) यांना बाद केले.

कोणत्याही टप्प्यावर विदर्भाच्या फलंदाजांनी त्यांच्यासमोरील प्रचंड मोठे लक्ष्य गाठण्याचा हेतू दाखविला नाही, परंतु अथर्व तायडे (32) वगळता इतर सर्वांनी खेळपट्टीवर शक्य तितका जास्त काळ टिकून राहण्याचे काम केले. तायडेने 19 व्या षटकात शम्स मुलानी (56 धावांत 1 बळी) याला स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि तो पायचित झाला, त्यानंतर मुंबईने लवकरच शोरेला परत पाठवले. अमन मोखाडेला 15 धावांवर असताना जीवदान मिळून त्याचा स्वीप फटका थेट फाइन लेगवरील कोटियानकडे गेला असता त्याने झेल सोडला. मात्र मैदानावरील पंचांनी पायचित ठरविल्यानंतर पुनरावलोकन करूनही निर्णय विरोधात गेल्याने मोखाडे या जीवदानाचा पुरेपूर उपयोग करू शकला नाही. त्याला 32 धावा काढता आल्या.

91 चेंडूंत नाबाद 56 धावा काढणारा वाडकर त्याच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा जास्त आक्रमक दिसला. त्याने अपर कटद्वारे षटकार हाणून आपले अर्धशतक पूर्ण केले. विदर्भाच्या कर्णधाराने नायरसह पाचव्या गड्यासाठी 90 धावा जोडल्या, ज्यासाठी त्यांनी 173 चेंडूंचा सामना केला.

संक्षिप्त धावसंख्या : मुंबई पहिला डाव 224, विदर्भ पहिला डाव 105, मुंबई दुसरा डाव 418, विदर्भ दुसरा डाव 92 षटकांत 5 बाद 248 (अथर्व तायडे 32, अमन मोखाडे 32, कऊण नायर 74, अक्षय वाडकर नाबाद 56 धावा, तनुष कोटियन 2/56, मुशिर खान 2/38)

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article