पहिल्याच दिवशी विदर्भाची त्रिशतकी मजल
मुंबईच्या गोलंदाजांची निराशा, दिवसअखेरी विदर्भाच्या 5 बाद 308 धावा : ध्रुव शोरे, दानिश मालेवारची अर्धशतके
वृत्तसंस्था/ नागपूर
येथील जामठा मैदानावर खेळवल्या जात असलेल्या मुंबईविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात विदर्भाने पहिल्या दिवशी 5 गडी गमावत 308 धावा केल्या आहेत. ध्रुव शोरे व दानिश मालेवार यांनी शानदार अर्धशतके झळकावत विदर्भाच्या डावाला आकार दिला.

प्रारंभी, विदर्भाचा कर्णधार अक्षर वाडकरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर अथर्व तायडे अवघ्या 4 धावा काढून बाद झाला. यानंतर ध्रुव शोरे व पार्थ रेखाडे यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमलेली असताना 23 धावांवर रेखडे बाद झाला. पण, ध्रुव शोरेने मात्र संयमी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्याने 109 चेंडूत 9 चौकारासह 74 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याला दानिश मालेवारने 7 चौकार व 1 षटकारासह 79 धावा करत चांगली साथ दिली.
अर्धशतकानंतर ध्रुवचा अडथळा शम्स मुलानीने दूर केला. ध्रुव बाद झाल्यानंतर फलंदाजी आलेल्या करुण नायरने 6 चौकारासह 45 धावांची खेळी केली. नायरचे अर्धशतक मात्र 5 धावांनी हुकले. दानिश मालेवारलाही 79 धावांवर शम्स मुलानीने माघारी धाडले. यानंतर यश राठोड व कर्णधार अक्षय वाडकर यांनी संयमी फलंदाजी करत दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने 88 षटकांत 5 गडी गमावत 308 धावा केल्या होत्या. राठोड 47 तर अक्षय वाडकर 13 धावांवर खेळत होते. मुंबईकडून शिवम दुबे व शम्स मुलानी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव 88 षटकांत 5 बाद 308 (ध्रुव शोरे 74, दानिश मालेवार 79, करुण नायर 45, यश राठोड खेळत आहे 47, वाडकर खेळत आहे 13, शम्स मुलानी व शिवम दुबे प्रत्येकी दोन बळी).