निर्वाचन अधिकारी न आल्याने वेर्ला काणका ग्रामसभा रद्द
पंचायत मंडळाला विश्वासात न घेता सचिवांकडून पोलिसांना बोलाविल्याने वातावरण तंग
म्हापसा : वेर्ला काणका पंचायतीची रविवारी बोलाविण्यात आलेली ग्रामसभा हातळण्यासाठी गटविकास कार्यालयातून निरीक्षक (निर्वाचन अधिकारी) न पाठविल्याने ग्रामसभा अर्ध्यावरच रद्द करावी लागली. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर सरपंच, पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता सचिव निकीता परब यांनी ग्रामसभेस पोलीस बंदोबस्त मागविल्याबद्दल नागरिकांनी त्यांना धारेवर धरले. वेर्ला काणका पंचायतीच्या ग्रामसभेला ठरल्यावेळेनुसार सरपंच, उपसरपंच, सचिव उपस्थित होते. सरपंच आरती च्यारी यांनी सर्वांचे स्वागत केले मात्र गटविकास कार्यालयातून निरीक्षक न आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाला. सचिव निकीता परब यांनी निरीक्षक नसल्यास आपण ग्रामसभा घेऊ शकत नाही असे सांगितले.
पोलीस आल्याने वातावरण तंग
ग्रामसभा सुऊ होत असतानाच पंचायतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक गौरव नाईक पोलीस फौजफाट्यासह दाखल झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. सरपंच आरती च्यारी, उपसरपंच दिगंबर कळंगुटकर, पंच वासुदेव कोरगावकर, सागर लिंगुडकर, ग्रामस्थ सुदेश किनळकर आदींनी याबाबत सचिव निकीता परब यांना याबाबत प्रश्न केला. प्रथम सचिवांनी मौन धारण केले मात्र ग्रामस्थ आक्रमक होताच आपल्या संरक्षणासाठी पोलिसांना बोलाविल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच आपली दीड महिन्यापूर्वीच या पंचायतीत बदली झाली असून येथील लोकांची कामे करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहे, मात्र आपली मानसिक छळवणूक होत आहे. आपण सरकारी कर्मचारी असून ग्रामसभा रद्द झाल्याने आपण काही बोलू शकत नाही, असे म्हणत सचिवांनी सभागृहातून काढता पाय घेतला.
सचिवांच्या कृतीचा ग्रामस्थांकडून निषेध
सरपंच व पंचायत मंडळाला विश्वासात न घेता परस्पर पोलिसांना बोलविण्याच्या सचिवांच्या कृतीचा ग्रामस्थ तसेच पंचायत मंडळाने निषेध केला. ग्रामसभेतून उठून जाणाऱ्या सचिवांना ग्रामस्थांनी अडवून इतिवृत्त बुकवर ग्रामसभा रद्द करण्यामागील कारण लिहिण्यास सांगितले. निर्वाचन अधिकारी न आल्याने ग्रामसभा रद्द झाल्याचे सचिवांनी लिहिल्यावर सभा रद्द करण्यात आली.
सचिवांकडून परस्पर परवाना
शनिवारी पंचायतीची मासिक बैठक होती. बैठकीत वेर्ला काणका येथे दिल्लीतील इसम बांधत असलेल्या प्रकल्पाच्या भोवती कुंपण बांधण्यास सचिव निकीता परब यांनी पंचायत मंडळाला विश्वासात न घेता परवाना दिला. या प्रकल्पाच्या बाजूने गावातील पारंपरिक वाट असल्याने पंचायत मंडळाने कुंपण बांधकामास परवाना देण्यास नकार दिला होता मात्र सचिव परब यांनी रजेवऊन येत त्या बांधकामास परवाना दिला. त्यामुळे सचिव व पंचायत मंडळ यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. त्या भीती पोटीच सचिवांनी ग्रामसभेला पोलीस बोलाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.