कार्तिकीसाठी वारकरी पंढरपूरला रवाना
सुखकर प्रवासासाठी वारकऱ्यांकडून रेल्वेला पसंती : मात्र, उत्सव स्पेशल रेल्वे नसल्याने वारकऱ्यांतून नाराजी
बेळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त बेळगावमधून वारकरी पंढरपूरला रवाना होत आहेत. मंगळवारी पंढरपूरला रवाना होण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांची गर्दी झाली होती. बेळगावमधून थेट रेल्वे नसल्याने मिरजपर्यंत पोहोचून तेथून मिळेल त्या रेल्वेने पंढरपूर गाठावे लागत आहे. गुरुवार दि. 23 रोजी कार्तिक एकादशी आहे. बेळगाव परिसरात अनेक वारकरी आहेत. बसपेक्षा रेल्वेचा प्रवास सुखकर असल्याने प्रवाशांकडून रेल्वेला पसंती दिली जाते. केवळ बेळगावच नाही तर चंदगड, खानापूर परिसरातूनही प्रवासी बेळगावमध्ये येत असून तेथून पंढरपूरला रेल्वेने प्रवास करीत आहेत. आषाढी व कार्तिकी या दोन्ही वाऱ्यांसाठी विठ्ठल भक्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. एक दिवस आधी पंढरपूरला पोहोचून दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची धडपड सुरू असते. दरवर्षी नैर्त्रुत्य रेल्वेकडून बेळगाव-पंढरपूर मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सोडली जाते. परंतु यावर्षी नैर्त्रुत्य रेल्वेने याकडे दुर्लक्ष केल्याने विठ्ठल भक्तांचे हाल होत आहेत. बेळगावमधून पंढरपूरला थेट रेल्वेसेवा नसल्याने भक्तांना मिरज जंक्शन येथे उतरून तेथून मिळेल त्या रेल्वेने पंढरपूर गाठावे लागत आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या कारभाराबद्दल वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.