नि:पक्षपाती मतमोजणीची विविध संघटनांची मागणी
बेळगाव : निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणामुळे मतमोजणी व्यवस्थित होणार का? असा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नि:पक्षपातीपणे मतमोजणीची प्रक्रिया होईल, यासाठी काळजी घ्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शेतकरी संघटनेचे सिदगौडा मोदगी, यासीन मकानदार, शंकर ढवळी, मंदा नेवगी आदींसह कामगार संघटना, दलित संघटना, महिला संघटना व विविध पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यासंबंधी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जनादेशाचे उल्लंघन, घोडेबाजाराला संधी देऊ नये, जनतेच्या इच्छेप्रमाणे लोकशाहीत निवडणूक निकाल जाहीर केला जावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. निवडणूक आयोग पक्षपाती तर भाजपची हुकूमशाही वागणूक या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नि:पक्षपातीपणे निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही विविध पुरोगामी संघटनांनी केली आहे.