महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भूगोलातून मूल्यशिक्षण

06:04 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एडमंड बर्क या विचारवंताने भूगोलाचे अगदी मार्मिक वर्णन करताना म्हटले आहे की भूगोल हा ऐहिक विषय आहे, पण स्वर्गीय विज्ञान आहे. भूगोलाकडे बघण्याची, विचार करण्याची वेगळी दृष्टी देऊन जातात. विषय म्हणून भूगोल शिकवणारे शिक्षक खूप आहेत. ते माहिती देण्याचे काम उत्तम करतात. गूगल तर गुरूजींपेक्षाही अधिक माहिती देतो. पण माहिती देण्यापेक्षा दृष्टी विकसीत करणे आणि विषयाच्या तात्त्विक बाबींकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणे हे अधिक महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.

Advertisement

आपण राहतो ती पृथ्वीच फक्त भूगोलाच्या कक्षेत येत नाही. पृथ्वी आपल्याला केवढी मोठी वाटते. पण अवकाशात नजर टाकली तर हे भूमंडळ किती ग्रह नक्षत्र आणि  ताऱ्यांनी भरलेले आहे याची नुसती कल्पना केली तर पृथ्वी किती छोटी! त्यावरचे खंड आणखी छोटे. प्रत्येक खंडातील देश त्यापेक्षा छोटे. प्रत्येक देशातील (आपण आता फक्त भारताचा विचार करू) राज्ये आणखी छोटी, या राज्यांच्या अंतर्गत येतात जिल्हे, नंतर तालुके, नंतर गावे, वस्त्या, या वस्तीतले आपले छोटे घर आणि त्या घरात राहणारा ‘मी’ हा किती छोटा, शुद्र, विश्वाच्या पसाऱ्यासमोर तर कस्पटासमान, तरीही आपल्याला केवढा अहंकार आणि दुरभिमान!

Advertisement

भूगोलाच्या अध्यापनातून हा अहंकार, दुरभिमान, गर्वहरण करण्याची विलक्षण ताकद आहे. स्वामी स्वरूपानंदांना अर्पिलेली एक मधुर भूपाळी आहे. त्यातील अगदी पहिली ओळ ‘माझे माझे लोप पावू दे. तुझे तुझे उगवू दे’. भूगोलातून विश्वाचे विशाल दर्शन होता होता ‘माझे माझे’ हा भाव क्षीण होण्याची शक्यता आहे. ‘विद्या विनयेत शोभते’ मधील विनय व्यक्तिमत्त्वात झिरपण्याची संभावना आहे.

सर्व शक्तींचा स्त्राsत आहे सूर्यनारायण. किती तेजस्वी! हे तेज आपल्यामध्ये यावे अशी आशा कोणाला नाही! सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता दोन्ही आवश्यक. सूर्य किंवा चंद्रासारखा एकच पुत्र पुरे अशा आशयाची संस्कृत सुभाषिते खूप आहेत. शिक्षकाला सूर्य आणि चंद्रासंबंधी सांगतासांगता हळूच, अलगदपणे आपल्या मातापित्यांना आपला अभिमान वाटावा असे बनले पाहिजे हे सूचवता येते. त्यांची दृष्टी आता वळवत आपण असे खरंच आहोत का हा अंतर्मुख करणारा प्रश्न (हा प्रश्न परीक्षेसाठी, गुणांसाठी नाही) विचारता येतो. भूगोलात अनेक नद्यांचे वर्णन आणि माहिती येते. प्रत्येक नदीची वेगळी कथा आहे. सांस्कृतिक संदर्भ आहे. माहिती सोबत ही महतीही सांगायला हवी. आपल्या जीवनात नद्यांचे केवढे मोठे आणि विलक्षण स्थान आहे. आपल्या देशात तर नदीला माता मानले आहे. एका कविनं म्हटलं आहे...

नदीया न पिती अपना जल

वृक्ष न खाते अपना फल!

‘स्व’च्या पलीकडे जाऊन इतरांचाही विचार करायला हवा. विश्वातील प्रत्येक घटकाकडून आपण सतत घेतच असतो. पण ‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ याचेही भान हवे. भूगोलाच्या अध्यापनातून हे भान विकसीत करणे हे भूगोल शिक्षकाने विसरून चालणार नाही. निसर्ग भरपूर देतो. लोकसंख्या कितीही वाढली तरी निसर्ग सर्वांचे भरण, पोषण करू शकतो. पण कोणाची हाव पुरी करू शकत नाही, असे

म्हणतात.

Nature has enough to satisfy the need.
But it cannot satisfy the greed.

निसर्गाचे क्रूर शोषण चाललेय. त्यामुळे प्रचंड हानी होतेय आणि नैसर्गिक संकटेही उद्भवतात. भूगोल हा विषय खूप विस्तृत तर आहेच पण यासाठी उत्तम साधन आहे. अलीकडे ‘शाश्वत विकास’ हा शब्दप्रयोग खूप प्रचलनात आहे. परमेश्वराने हे सगळे माझ्या भोगासाठीच निर्माण केलेले आहे. या आत्मविनाशी विचारापासून परावृत्त व्हायला हवे.

Geography is a synthesis of all subjets and all subjects are part of geography.  भूगोल हा सर्व विषयांचा संयोग आहे. सर्व विषय भूगोलाचे भाग किंवा अंग आहेत. इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण असे सर्वच विषय भूगोलाशी निगडीत आहेत. ज्ञानाची विभागणी, वाटणी करता येत नाही. ज्ञान अखंड आहे. हा एकात्मिक (होलिस्टीक) विचार प्रभावी पद्धतीने मांडायला हवा. त्याचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवायला हवे. प्रत्यक्ष अनुभवायला द्यायला हवे. भूगोलाच्या शिक्षकांचे कौशल्य या ठिकाणी पणाला लागते.

स्वावलंबी, परावलंबी आणि परस्परावलंबी अशा तीन अवस्था आहेत. अनेकांना आपण पूर्ण स्वावलंबी, कोणावरही अवलंबून नाही असा दर्प असतो. वास्तविकपणे माणसाइतका परावलंबी अन्य कोणताच प्राणी नसेल. आपण परस्परावलंबी अधिक आहोत हे भूगोल अधिक चांगल्या प्रकारे सांगतो. या विश्वाची एकमेकांना जोडणारी साखळी आहे. कोणीही पूर्णांशांने स्वावलंबी नाही. त्यामुळे सहयोग, साहचार्य, सहकार्य, सामोपचार, सहअस्तित्त्व याचे सदैव स्मरण हवे. हे स्मरण करून देण्याची क्षमता भूगोल विषयात खूप आहे.

भूकंप, पूर, ज्वालामुखी, वादळ अशा नैसर्गिक आपदांच्या तडाख्यात देशोदेशीचे जनजीवन पार विस्कळीत होऊन जाते. अशावेळी मानवतेचे दर्शनही घडते. कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू होतो. शत्रू की मित्र राष्ट्र आहे, याचाही विचार केला जात नाही. सीमा पूसट होतात. शालेय मुलेही समाजात जाऊन मदत गोळा करतात. विश्वबंधुत्वाचे दर्शन घडते. हे संस्कार मूल्य फार मोलाचे

आहे.

प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या सर्व गरजा भागवू शकत नाही, अनेक बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागते. पूर्णांशाने स्वावलंबी कोणताच देश नाही. सहअस्तित्त्व किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून द्यायला हवे. आपण आपल्या देशाचे जसे नागरिक आहोत तसेच जागतिक नागरिकही (ग्लोबल सिटीझन) आहोत. भूगोल याची जाणीव करून देतो. खगोलशास्त्र, हवामान, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र असे अनेक विषय भूगोलांतर्गत येतात. या सर्व शास्त्रांचा, विषयांचा मानवी जीवनावर प्रभाव आहे. मानवाच्या जडणघडणीत यांचा मोठा वाटा. हा विशाल पट विद्यार्थ्यांसमोर उलगडून मांडण्याचे, दाखवण्याचे काम हे गृहपाठ, परीक्षा यांच्या पलीकडचे आव्हानात्मक, सृजनात्मक असे काम आहे.

भूगोल विषयात विद्यार्थ्यांला शंभर टक्के गुण जरूर मिळावेत. पण पेपरमधल्या गुणांबरोबरच राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टीकोण, पर्यावरण संरक्षण, सहकार्य हे गुण, मूल्य किंवा संस्कार जीवनात संक्रमित कसे होतील याची चिंता आणि चिंतन व्हायला पहिजे.

विष्णूपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे । ही विनम्रता, कृतज्ञताच सर्वांत अधिक महत्त्वाची. मनुष्य देवही होऊ शकतो आणि दानवही होऊ शकतो.

देव सदा देव तथा दनुज दनुज है ।

जा सकते किन्तु दोनो ओर ही अनुज है । मनुष्य आपल्या उदात्त कर्माने देव आणि निकृष्ट कर्माने दानव होऊ शकतो. भूगोलाचे यथार्थ ज्ञान आणि अध्यापन त्याला देवत्त्वाकडे जायला मदत करू शकते. भूगोल विषयाकडे आपण असे पाहू शकतो?

- दिलीप व. बेतकेकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article