अवकाळी पावसाचा आंबा -काजू पिकांवर होणार परिणाम
बागायतदार चिंतेत
न्हावेली / वार्ताहर
काल रात्री विजांसह अवकाळी पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. सध्या दोन दिवस वातावरण ढगाळ होते.त्यात करुन वातावरणात बदल जाणवत होता. अशातच काल रात्रीपासून अचानक पाऊस आल्याने सर्वांची एकच धांदल उडाली.सध्या थंडीचे दिवस असून मात्र अवकाळी पावसामुळे वातावरणात सर्वांना एकाचवेळी थंडी -गर्मी- धुके पाऊस हे वातावरणातील बदल एकत्र अनुभवायला मिळत आहेत. वातावरणातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यावर्षी आंबा व काजू पिकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.आंबा -काजू पिकांवर कीड लागून याचा फळांवर परिणाम होणार आहे.यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होऊन यावर्षी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. यामुळे बागायतदार चितेंत आहेत. दरम्यान , झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळीकडे रस्ते चिखलमय होऊन निसरडे झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर माती येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच वातावरण ढगाळ आहे.