For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जातीनिहाय जनगणनेला संघाचे समर्थन

06:53 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
जातीनिहाय जनगणनेला संघाचे समर्थन
Advertisement

अशी जनगणना समाजहितासाठी आवश्यक असल्याचे समन्वय अधिवेशनात प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था / पलक्कड (केरळ)

जातीनिहाय जनगणना समाजाच्या व्यापक हितासाठी आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. केरळमधील पलक्कड येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघप्रणित सामाजिक संस्था यांच्या समन्वय अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे.

Advertisement

हिंदू समाजात ‘जात’ हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा यांच्यासाठी जनगणना अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया अत्यंत गंभीरपणाने घेतली पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्य करावी. तथापि, तिचा राजकारणासाठी उपयोग करु नये, असे आवाहन संघाने या अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला केले.

तीन दिवसांचे अधिवेशन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या समन्वय अधिवेशनाचा प्रारंभ 31 ऑगस्टला झाला होता. सोमवारी अधिवेशनाची सांगता करण्यात आली. अखेरच्या दिवशी चार महत्वाच्या मुद्द्यांवर विचारविमर्श करण्यात आला. जातीनिहाय जनगणना, पश्चिम बंगालमधील भीषण महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण, समान नागरी संहिता आणि बांगला देशमधील हिंदूंचे संरक्षण हे ते चार मुद्दे होते.

समान नागरी संहिता

समान नागरी कायद्याची चर्चा आधीपासूनच समाजात होत आहे. उत्तराखंडच्या सरकारने समान नागरी संहिता लागू केली आहे. ती लागू करण्यापूर्वी लोकांसमोर मांडण्यात आली होती. त्यावेळी 2 लाखांहून अधिक लोकांनी त्यांची मते व्यक्त केली होती. राष्ट्रीय पातळीवरही समान नागरी संहिता लागू केली जाणे आवश्यक आहे. जनतेशी संवाद साधून हे कार्य करावे, अशी सूचना करण्यात आली.

वक्फ संबंधीचे प्रकरण

वक्फ मालमत्तेच्या दुरुपयोगाच्या संदर्भात मुस्लीम समाजाकडूनही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. यावर संसदीय समितीत चर्चा होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सरकारला साहाय्य करण्यास सज्ज आहे. व्यापक पातळीवर चर्चा करुन यासंबंधी योग्य तो निर्णय घेतला जावा, असे आवाहनही संघाने केंद्र सरकारला केले आहे.

कोलकाता प्रकरण गंभीर

कोलकाता येथे घडलेली बलात्कार आणि हत्या घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. सारा देश यामुळे चिंतेत आहे. संघाच्या या अधिवेशनात या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा, या विषयावरील कायदे, गुन्हेगारांना शिक्षा आणि अशा प्रकरणांच्या त्वरित न्यायालयीन हाताळणीसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बांगलादेशातील स्थिती

बांगला देशात हिंदूंची स्थिती अत्यंत नाजूक असून तेथील हिंदूंच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. त्या देशातील हिंदूंच्या अवस्थेसंबंधी अनेक संघटनांनी त्यांचे अहवाल सादर केले आहेत. तेथील हिंदूंची स्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांना साहाय्यता देण्यासाठी व्यापक योजना आवश्यक आहे, असे संघाने स्पष्ट केले.

 2023 मध्येच केले होते सावध

विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येत असले तरी भारतीय जनता पक्षाला घाबरण्याचे कारण नाही. मात्र, निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या वर्षीच्या बैठकीतच दिला होता. तो गांभीर्याने घेण्याची आवश्यकता होती, असेही संघाने स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्ष आणि संघ यांच्यात समन्वय अधिक दृढ होण्याची आवश्यकता आहे, असेही मत या अधिवेशनात काही नेत्यांनी व्यक्त केले.

अधिवेशनात समाजकारणावर विचार

ड संघाशी अधिकाधिक समाजघटकांना जोडण्यासाठी व्यापक जनसंपर्क

ड अधिवेशनात विविध घटनांवर सविस्तर चर्चा, समाजहितासाठी निर्णय

ड संघप्रणित समाजिक संस्थांच्या कामगिरीचा आणि समन्वयाचा आढावा

Advertisement
Tags :

.