उद्धवाला विदेहकैवल्यता मृत्यूपूर्वीच प्राप्त झाली होती
अध्याय एकोणतिसावा
नाथमहाराज म्हणाले, बद्रीकाश्रमाला विशालतीर्थ म्हणतात कारण तेथे समस्त लोकांचे हित व्हावे म्हणून नारायण अद्यापि अनुष्ठान करत आहेत. त्यामुळे जे साधक मोक्षमार्गाची वाटचाल करत आहेत त्यांच्यावर त्यांची पूर्ण कृपा होते. ह्या क्षेत्री साधकाला तपाचे फल मिळवण्यासाठी दीर्घकाळ तप करावे लागत नाही. थोड्याशा ध्यानधारणेने सर्व गुह्य ज्ञान हातात येते. थोड्याशा विरक्तीने मोक्ष मिळतो. ह्या तीर्थस्थानाच्या महात्म्याने विरक्ती थोडा काळ जरी आली तरी नारायणाच्या कृपेने तो मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणून ह्या क्षेत्राला विशाल तीर्थ असे म्हणतात. उद्धवाला जगातील सर्व चराचर वस्तुत ईश्वरी अंश असल्याची जाणीव होत असल्याने त्याला समोर दिसणारी प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तू नावानिशि वेगवेगळी न वाटता ईश्वराचे रूपच वाटत असे. अशी स्थिती प्राप्त व्हावी म्हणून भगवंतांनी अंगी अत्यंत नम्रता बाणायला हवी असे पूर्वीच सांगितले होते. सर्वसामान्य लोकांना ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी हा सगळ्यात सोपा उपाय आहे हेही सांगितले होते. त्यानुसार उद्धव सगळ्यांच्याप्रती नम्रभाव बाळगून होता. त्यामुळे तो जगाचा सुहृद बंधु झाला होता. त्याच्या अंतर्यामी गोविंदाशिवाय कोणीच नव्हतं. भगवंतांचा उपदेश मिळाल्यावर त्यांच्या आज्ञेनुसार उद्धव बद्रीकाश्रमात राहू लागला. भगवंतांनी केलेल्या उपदेशानुसार तो लोकांना परमार्थ निष्ठेने कसा करावा हे सांगू लागला. भगवंतांच्याकडून उपदेश मिळालेला असल्याने उद्धवाची ज्ञानभक्ती आणि विरक्ती खूपच उच्च कोटीची होती आणि त्याच दर्जाचा उपदेश तो साधकांना करत होता. जर गुरुलाच विषयांची आवड असेल तर शिष्यात विरक्ती कुठून येणार? गुरुच जर अधर्माने वागणारा असेल तर शिष्य अधर्म कृत्यातून निवृत्त कसा होणार? पण उद्धव आदर्श सद्गुरु असल्याने उद्धवाप्रमाणे वागण्याचा सर्वजण प्रयत्न करत होते. अशाप्रकारे उद्धव विरक्त वृत्तीने बद्रीकाश्रमात परोपकार करण्यासाठीच राहीला होता. श्रीकृष्णनाथाच्या उपदेशाप्रमाणे उद्धव वागत असल्याने त्याच्या शिकवणुकीप्रमाणे वागून सर्वजण विरक्त झाले आणि परमार्थसाधना करू लागले. उद्धवाला उपदेश करून भगवंतांनी त्याला परब्रह्माची प्राप्ती करून दिली. त्यामुळे उद्धवाची ब्रह्मस्थिती अहोरात्र अखंड टिकून होती. मग कधी तो आसन घालून ध्यानात बसलेला असे तर कधी तो इकडेतिकडे फिरत असे पण तो कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याचे ब्रह्मपण कधीच मोडत नसे. विरक्ती आणि भोगासक्ती ह्या दोन्ही माणसाच्या देहबोलीतून व्यक्त होतात पण उद्धव ह्या दोन्हीच्याही पलीकडे असलेल्या परब्रह्मस्थितीत होता. त्याच्या संचित कर्माचा नाश झालेला असल्याने त्याच्यासाठी नवीन प्रारब्ध तयार होणार नव्हते. त्यामुळे सध्याच्या जन्मातील त्याचे आयुष्य संपले तो पूर्णब्रह्म होणार असल्याने त्याला पुन्हा जन्ममरण नव्हते. मी म्हणजे हा देह, ही सर्वसामान्य लोकांना असणारी देहभावना भगवंतांनी उपदेश करण्यापूर्वी उद्धवामध्येही होती परंतु भगवंतांनी त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्याची देहभावना समूळ निर्दाळून टाकून त्याचा ब्रह्मानुभाव दृढ केला होता. त्यामुळे देहांत झाल्यावर त्याला ‘विदेहकैवल्या’ स्थिती प्राप्त होईल असे म्हणणे हा एक भ्रम ठरला असता कारण देहांतानंतर उद्धवाला विदेहकैवल्यावस्था प्राप्त होईल ही कल्पनाच चुकीची आहे. ज्याप्रमाणे सोन्याच्या बांगड्या केल्या आणि नंतर त्या मोडल्या तरी त्यातल्या सोन्याला काहीच फरक पडत नाही त्याप्रमाणे उद्धवाच्या देहाला जरी जन्ममरण घडत असले तरी उद्धवाचा त्या देहाशी काहीच संबंध नव्हता कारण तो सर्व परिपूर्ण परब्रह्म होता. त्यामुळे तो जरी देहाच्या हालचाली करत असला तरी तो नित्य मुक्त विदेही होता. त्यामुळे त्याला विदेहकैवल्यता मृत्यूपूर्वीच प्राप्त झाली होती असे म्हणणे उचित ठरेल.
क्रमश: