प्रतापगडावरील भवानीमातेच्या चरणी उदयनराजे लीन ; देवीला घातले 'हे' साकडे
ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान
प्रतापगड : महाराष्ट्र सध्या पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीतून जात आहे. अनेकांचे पिके नष्ट झाली, कर्जबाजारीपण वाढले आहे. भवानीमातेच्या कृपेने हे संकट लवकरच दूर व्हावे, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि महाराष्ट्र पुन्हा सुख-समृद्धीच्या मार्गावर यावा, हीच आजची माझी खरी प्रार्थना आहे, असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत भवानीमातेचा नवरात्र उत्सव
प्रतापगडावर मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या उत्सवाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता प्रत्येक कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. घटस्थापना, महालक्ष्मी पूजन, होम-हवन, नवचंडी यज्ञ आणि शेवटी दसरा सिमोलंघन अशा विविध धार्मिक विधींनी प्रतापगडाचा परिसर नवरात्रभर दुमदुमत असतो. या सर्व कार्यक्रमांना छत्रपती घराण्याचे वारसदार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आपला पाठिंबा देतात आणि विशेषतः नवचंडी यज्ञाला मात्र ते आवर्जून उपस्थित राहतात. या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या पत्नी . छ. दमयंतीराजे भोसले याही उपस्थित होत्या.
परंपरा जपण्याची सातत्यपूर्ण परंपरा उदयनराजे भोसले हे दरवर्षी प्रतापगडावरील नवरात्र उत्सवातील सर्व महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. घटस्थापनेपासून ते नवचंडी यज्ञापर्यंत आणि शेवटी दसऱ्याच्या सिमोलंगन सोहळ्यापर्यंत ते श्रद्धापूर्वक सहभागी होतात. त्यांच्या या उपस्थितीमुळे भाविकांना प्रेरणा मिळते तसेच नवरात्र उत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित होते.
प्रतापगड जिर्णोद्धार आणि विकासकामांचा उल्लेख
महाराजांनी यावेळी प्रतापगडाच्या जिर्णोद्धाराच्या कामांचा विशेष उल्लेख केला. "हा किल्ला म्हणजे आपला वारसा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. येथे सुरू असलेल्या कामांना वेग यावा, पर्यटकांसाठी अधिक सोयीसुविधा व्हाव्यात आणि प्रतापगड अधिक भव्य स्वरूपात देशभरात ओळखला जावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.
ग्रामस्थांशी आपुलकीचा संवाद नवरात्र सोहळ्यानंतर महाराजांनी प्रतापगड ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या काही स्थानिक मागण्या पुढे मांडल्या. प्रतापगडाकडे येणारा रस्ता दुरुस्त व्हावा, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटावा, स्थानिक विकासकामांना गती मिळावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या. महाराजांनी त्या लक्षपूर्वक ऐकून घेऊन शक्य ती मदत करण्याचे आश्वासन छत्रपती दिले.
ग्रामस्थांनी घराण्याच्या या आपुलकीबद्दल समाधान व्यक्त केले.
संपूर्ण प्रतापगडावर नवरात्र सोहळ्यादरम्यान भक्ती, परंपरा आणि उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत भवानीमातेचे दर्शन घेतले. ढोल-ताशांचा गजर, शंखनाद आणि 'जय भवानी, जय शिवराय'च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी, स्थानिक प्रश्नांवरील चर्चा आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनाची हमी या सर्वांचा संगम यंदाच्या नवरात्र उत्सवात अनुभवायला मिळाला. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष तेज लाभले.
महाआरती आणि नवचंडी यज्ञ
यंदाही परंपरेप्रमाणे उदयनराजे भोसले आपल्या पत्नीसह प्रतापगडावर दाखल झाले. सकाळच्या मंगल बातावरणात भवानीमातेची महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर महाराजांनी भक्तिभावाने नवचंडी यज्ञ पूर्ण केला. महाराष्ट्रासह देशाच्या सुख-समृद्धीची मंगलकामना करत त्यांनी भवानीमातेच्या चरणी साकडे घातले. या सोहळ्यात पारंपरिक मंत्रोच्चार, शंखनाद, ढोल-ताशांचा गजर आणि 'जय भवानी, जय शिवराय'च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.