बेपर्वाईमुळे स्वयं अपघातात बांबोळीत आसामचे दोघे ठार
अतिवेग, हेल्मेट न वापरल्याचा परिणाम
पणजी : बांबोळी येथील होली क्रॉसजवळ काल रविवारी सायं. 4. 15 वा. सुमारास झालेल्या स्वयं अपघातात दोन युवक ठार झाले. अपघाताची माहिती आगशी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमींना गोमेकॉत पाठविले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्यांची नावे अच्युत गोगय आणि पापू गोगय अशी आहेत. दोघेही आसाम येथील असून वेर्णा औद्यगिक वसाहतीत ते सुरक्षारक्षक म्हणून कम करीत होते. अच्युत हा दुचाकी चालवत होता, तर पापू मागे बसला होता. जीए-06-जे-2351 क्रमांकाची पल्सर दुचाकी घेऊन वेर्णाहून पणजीच्या दिशेने येत होते. दुचाकी इतकी वेगात होती की बांबोळी होली क्रास चर्चजवळ पोचताच त्यांचा दुचाकीवरील ताबा गेला. त्यामुळे रस्त्यावरील दुभाजकाला धडक देऊन दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या लोखंडी पाईपला धडक देऊन रस्त्यावर पडली. अच्युतने हेल्मेट घातले नव्हते. दोघांचीही डोकी रस्त्यावर आपटली होती.
अतिवेग, बेपर्वाईमुळे अपघात
एप्रिल महिन्यात वाहन अपघातांचा कहर झाला असून 1 एप्रिल ते 14 एप्रिल या चौदा दिवसात 109 अपघातांची नोंद झाली असून त्यात तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकाधिक तऊण-तऊणी होत्या. अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटणे. स्वयं अपघातात होणे, बेपर्वाईने वाहन चालविणे अशा कारणांमुळे बहुतांश अपघात झाल्याचे दिसून येत आहे.