मणिपूरमध्ये गोळीबारात आणखी दोघांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या ताज्या घटनेत सोमवारी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कांगपोकपी जिल्ह्यात दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर बराच तणाव निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले. हाराओथेल आणि कोबशा गावांमध्ये गोळीबार झाला असला तरी तो कसा सुरू झाला आणि तणाव कसा फैलावला याबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. एका आदिवासी संघटनेने मात्र कुकी-झो समुदायाच्या लोकांवर कोणत्याही चिथावणीशिवाय हल्ला केल्याचा दावा केला. तसेच जिल्ह्यात ‘बंद’ची घोषणा केली.
ईशान्येकडील मणिपूर राज्यात मे महिन्याच्या सुऊवातीस मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक कलह सुरू झाल्यापासून सशस्त्र गावकऱ्यांमधील गोळीबाराच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. आता झालेल्या ताज्या गोळीबारानंतर सदर भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असून या घटनेत सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कांगपोकपी-आधारित आदिवासी एकता समितीने जिल्ह्यात आपत्कालीन बंद घोषित केला.