रशिया-युक्रेन युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन सैन्यात भरती झालेल्या आणखी दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या आता चार झाली आहे. भारताने हे प्रकरण रशियाकडे जोरदारपणे मांडत रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांची लवकर सुटका करून परत पाठवण्याची मागणी केली आहे. वृत्तानुसार, रशियन सैन्यात सुरक्षा सहाय्यक म्हणून सुमारे 200 भारतीयांची भरती करण्यात आली होती. तर सपोर्ट स्टाफ म्हणून काम करणाऱ्या एकूण 10 भारतीयांना सोडण्यात आले असून त्यांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. रशियन सैन्याने भारतीय नागरिकांच्या कोणत्याही भरतीवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी भारताने केली आहे. असे उपक्रम भारत-रशिया भागिदारीशी सुसंगत नसल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. मार्चच्या सुऊवातीला हैदराबादच्या मोहम्मद अस्फानचा रशियन सैन्याच्या फ्रंट लाइन्सवर सेवा बजावताना मृत्यू झाला होता. तर फेब्रुवारीमध्ये डोनेस्तकमधील मंगुआ येथे युक्रेनच्या हवाई हल्ल्यात सुरतचे हेमल अश्विनभाई मारले गेले.