हलगा येथे दोन गवत गंज्यांना आग
शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान
वार्ताहर/किणये
हलगा गावातील शेतशिवारात ठेवण्यात आलेल्या दोन गवत गंज्यांना आग लागली आहे. या आगीत जनावरांसाठी ठेवण्यात आलेले पिंजर जळून खाक झाले आहे. यामुळे सुमारे 40 हजाराचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही आग लागली असून शिवारातून गेलेल्या विद्युतभारीत तारांच्या स्पर्शाने लागली आहे. विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने आग लागल्यामुळे हेस्कॉमच्या गलथान कारभाराबद्दल शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हलगा येथील शांतीनाथ साताप्पा चिकनप्पा यांनी आपल्या शेत शिवारामध्ये भाताच्या पिकाची मळणी केल्यानंतर दोन गवतगंज्या ठेवल्या होत्या. काही ठिकाणी महालक्ष्मीदेवी यात्रा सुरू आहेत. या यात्रा झाल्याबरोबरच या गवतगंज्यांचे पिंजर आपण गावाकडे घेऊन जाणार होतो मात्र जनावरांना हा सुका चारा नेण्याआधीच सोमवारी सकाळी जळून खाक झाला आहे. यामुळे सदर शेतकरी हतबल झाला आहे. अलीकडे गवत गंज्यांना आग लागण्याचे प्रकार वाढू लागली आहेत. जर गवतगंज्यांना आग शॉर्टसर्किटमुळे किंवा विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने लागत असतील तर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.