Vari Pandharichi 2025: पांडुरंगाच्या भेटीची आस, तुकोबांच्या पालखीचे उभे रिंगण उदंड उत्साहात
पालखीचे स्वागत करण्यासाठी माळीनगर येथील नागरिक आतुर झाले
माळीनगर : पांडुरंगाच्या भेटीची आस मनात ठेवून मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने वारकऱ्यांची पाऊले चालली आहेत. माळीनगर येथे जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण बुधवारी उत्साहात पार पडले. अकलूज येथील गोल रिंगण आणि मुक्काम झाल्यानंतर बुधवारी सकाळीच पालखीचे नित्योपचार आटोपून पालखीने माळीनगर (ता. माळशिरस) येथील विसाव्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
पालखीचे स्वागत करण्यासाठी माळीनगर येथील नागरिक आतुर झाले होते. घरासमोर रांगोळी काढून, वारकऱ्यांच्या जेवणाची तयारी आणि पालखीच्या दर्शनाची ओढ आणि उत्साह दिसून येत होता. माळीनगर हद्दीत प्रवेश करताच फटाक्यांची आतषबाजी झाली. प्रथम पुढे पालखी सोहळ्याच्या चौघडा रथाचे आगमन झाले.
त्यानंतर टाळ-मृदंगाच्या नादात वारकऱ्यांनी राम कृष्ण हरीचा गजर केला. पालखी स्वागतासाठी दि सासवड शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे, माळीनगरच्या सरपंच अनुपमा एकतपुरे, अनिल एकतपुरे, सहकारमहर्षी कारखान्याचे संचालक विराजसिंह निंबाळकर, बीजवडीचे माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, आरोग्य अधिकारी रामदास लोंढे, आत्माराम रन्हेर, नारायण रोकडे उपस्थित होते.
पालखीचे पाद्यपूजन दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे पूर्णवेळ संचालक गणेश इनामके व त्यांच्या पत्नी भारती इनामके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी परेश राऊत, मोहन लांडे, हरिता इनामके आदी उपस्थित होते.
विविध संघटनांकडून वारकऱ्यांसाठी सोयी-सुविधा
ग्रामपंचायत माळीनगर, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, महात्मा फुले पतसंस्था, माळीनगर मल्टिस्टेट, शुगरकेन सोसायटी आणि परिसरातील विविध संस्था, सामाजिक संघटना, मित्रमंडळ यांच्या वतीने पालखीच्या स्वागतासाठी चहा, नाश्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.