खड्डे भरण्याचा प्रयत्न की धूळफेक?
सकाळी भरलेली खडी संध्याकाळी उखडली
बेळगाव : गणेशोत्सव मंडळांच्या सूचनेनुसार रविवारी शहरातील खड्डे खडीने भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, ही प्रशासनाकडून निव्वळ धूळफेक असून सकाळी घातलेली खडी वाहनांची ये-जा झाल्याने संध्याकाळपर्यंत उखडून इतरत्र पडली. त्यामुळे ही खडी गणेशोत्सवापर्यंत राहणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात होता. शहराच्या मुख्य भागात महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यांमधून होऊ नये यासाठी खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी गणेशोत्सव महामंडळाने जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली होती. महामंडळाच्या मागणीची दखल घेत रविवारी समादेवी गल्ली, खडेबाजार, काकतीवेस, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड यासह परिसरातील खड्ड्यांमध्ये खडी भरण्यात आली. केवळ दिखावा करण्यासाठी खडी भरण्यात आली असून, मोठी वाहने गेल्यानंतर खडी इतरत्र फेकली जात आहे. एका दिवसातच खडी इतरत्र पसरली असल्याने प्रशासनाकडून निव्वळ धूळफेक केली जात असल्याची तक्रार मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. गणेशोत्सव अद्याप दहा ते बारा दिवस असल्याने तोवर ही खडी टिकणार आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.