For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलारीचे पाणी मार्कंडेय नदीत आणण्यासाठी प्रयत्न करा

12:21 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिलारीचे पाणी मार्कंडेय नदीत आणण्यासाठी प्रयत्न करा
Advertisement

माजी नगरसेवकांचे खासदारांकडे साकडे, गढूळ पाणीपुरवठ्याबाबत तक्रार

Advertisement

बेळगाव : तिलारी धरणाचे पाणी कालव्याद्वारे मार्कंडेय नदीत आणण्याच्या प्रमुख मागणीसह कॅन्टोन्मेंटचे हस्तांतरण करताना खुल्या जागांचा ताबा महापालिकेकडे द्यावा, एलअँडटी कंपनीला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सूचना करावी, यासह स्मार्ट सिटी कामातील त्रुटींबाबत माजी नगरसेवक संघटनेने रविवारी खासदार जगदीश शेट्टर यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. नागरिकांच्या समस्या लवकर सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन खासदारांनी दिले. बेळगाव शेजारील तिलारी धरणाचे पाणी कालव्याद्वारे मार्कंडेय नदीत सोडल्यास याचा फायदा बेळगावला होणार आहे.

बेळगाव परिसरातील शेकडो एकर शेती ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. केवळ बेळगावच नाही तर चंदगड तालुक्यातील 8 ते 10 गावांनाही पाणी उपलब्ध होणार आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याकडूनही तिलारी धरणाच्या पाण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी दिली. या प्रश्नाबाबत महाराष्ट्र व गोवा सरकारसोबत समन्वय साधल्यास बेळगावचा पाणीप्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.माजी आमदार रमेश कुडची यांनी स्मार्ट सिटीतील कामांच्या त्रुटींबाबत नाराजी व्यक्त केली.

Advertisement

त्याचबरोबर एलअँडटी कंपनीकडून गढूळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरात कविळाच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याची तक्रार केली. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणासोबत अरगन तलाव, व इतर खुल्या जागा जनावरांसाठी पाणी-चाऱ्यासाठी खुल्या करण्याची मागणी केली. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी कपिलेश्वर उड्डाण पुलाची दुरवस्था व  शनिमंदिर कॉर्नर येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत लक्ष वेधले. सर्व समस्या जाणून घेत माजी नगरसेवकांनीही पाठपुरावा करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, वंदना बेळगुंदकर, शिवनगौडा पाटील, दीपक वाघेला, राजकुमार मुर्कीभावी, शांतीनाथ बुडवी, संजय प्रभू, मोहम्मद पिरजादे, भंडारी यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.