‘वन नेशन, वन इलेक्शन’ला तृणमूल काँग्रेसचा आक्षेप
कोविंद यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला ममता बॅनर्जींचे पत्र
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या संकल्पनेशी सहमत नसल्याचे कळवले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्त्वाखालील उच्चस्तरीय समितीला पत्र लिहून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या संकल्पनेशी आपण असहमत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कोविंद यांना पाठविलेल्या पत्रात बॅनर्जी यांनी 1952 पासूनच्या निवडणुकीच्या विविध टप्प्यांचा संदर्भही दिला आहे. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने राजकीय पक्षांना पत्र लिहून या विषयावर त्यांचे मत मागवले होते. गेल्यावषी सप्टेंबरमध्ये समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. त्यांनी या मुद्यावर जनतेची मते मागवण्याबरोबरच राजकीय पक्षांनाही पत्र लिहून त्यांची मते आणि एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेवर भाष्य करण्याची सूचना केली होती.