For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टू बी ऑर नॉट टू बी...

06:20 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
टू बी ऑर नॉट टू बी
Advertisement

त्या दिवशी भेटायला आलेली माया खूप अस्वस्थ होती. मॅडम गेले कित्येक दिवस तुम्हाला भेटायचे होते परंतु घरातून बाहेर पडणेच अवघड झाले. सगळंच विचित्र झालं हो..असं म्हणत ती रडू लागली. मॅडम, आमचं हसतं खेळतं कुटुंब..कशाचीही कमतरता नाही परंतु एक विचित्र घटना घडली आणि आम्ही सगळेच हादरुन गेलो. माझ्या मुलाचा प्रेमभंग झाला आणि त्याने स्वत:च्या आयुष्याचा दोर स्वत:च कापून टाकला. ही घटना घडण्यापूर्वी ‘आई मला खूप कंटाळा आलाय. नको वाटत गं सारं..’ असं तो एकदोन वेळा म्हणाला होता. मी त्याच्याशी त्यावेळी बोलले. कसलं टेन्शन आहे का हे जाणून घ्यायचा प्रयत्नही केला पण हे असं होईल याचा खरोखरच अंदाज आला नाही.

Advertisement

तो ज्या दिवशी सकाळी असं बोलला त्याच दिवशी रात्री हे सारं घडलं. त्या मुलीसंदर्भात आम्हाला नंतर कळलं पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. दोष देणार कुणाला? ‘मी माझा पोटचा गोळा गमावलाय मॅडम, काळजावर दगड ठेऊन धाकट्या मुलासाठी आणि नवऱ्यासाठी उसनं अवसान आणून उभी आहे.’ असं म्हणून ती पुन्हा रडू लागली..थोड्या वेळाने पाण्याचा ग्लास समोर धरत म्हटलं, ‘मायाताई सावरा स्वत:ला. तुमचं दु:ख, वेदना मी समजू शकते. पण तुम्हाला उभं रहायला हवं. हो..मॅम. मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते आहे. थोडी सावरले आहे परंतु या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे माझे पती लोकांचे प्रश्न आणि त्यांचा त्यांच्या मनाशी चाललेला प्रश्नांचा झगडा या साऱ्यांनी अस्वस्थ आहेत. हे घडलं कसं? माझ्याच बाबतीत हे का व्हावं? आपल्याला आधी कळलं असतं तर हे थांबवता आलं नसतं का? पालक म्हणून आपण कुठे कमी पडलो का? तो बोलला असता तर काहीतरी करु शकलो असतो ना? हे आणि अशा अनेक प्रश्नांनी ते फार अस्वस्थ आहेत. मॅडम प्लीज काहीतरी करा. असं म्हणत माझा हात घट्ट पकडून ती हमसून हमसून रडू लागली. तो क्षण फार विचित्र होता. पोटचा गोळा गमावल्याचे दु:ख शब्दांपलीकडचे होते.

खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या, अडचणी, दु:ख असतेच. अनेकदा नको हे जगणे असा विचारही अनेकांच्या मनात येऊन जातो. परंतु जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसे हा विचार क्षणार्धात झटकून टाकतात. तर नकारात्मक भूमिकेमुळे काही व्यक्ती या विचाराशी खेळत राहतात. मनामध्ये हा विचार सतत घोळत राहतो आणि जगावे की मरावे या द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या व्यक्तीला त्यावेळी या विचारापासून परावृत्त करणारा हात मिळाला नाही तर आयुष्याची शोकांतिका होते.

Advertisement

आपले विचार, भावना एखादा प्रसंग हाताळण्याची क्षमता, आपला दृष्टिकोन कसा आहे यावर अनेक गोष्टी ठरत असतात. त्यामुळे आपल्या मनाची मशागत नीट होण्यासाठी अगदी सुरवातीपासून सजग असणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनाची वाटचाल करत असताना अनेक बऱ्या-वाईट घटना, निराशाजनक प्रसंग, वेगवेगळे खाचखळगे या गोष्टी असणारच आहेत. स्पर्धात्मक युग, नवनवीन आव्हाने, नात्यांमधील बेबनाव, काहीवेळा येणारे अपयश त्यातून येणारे नैराश्य, विविध प्रकारचे ताणतणाव याकडे आपण कसे पाहतो, त्याला कसे सामोरे जातो यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. स्वत:चा परिस्थितीचा समंजस स्वीकार आणि उणीवा दूर करण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, नकार देणे, नकार पचवणे, ताणतणावाचे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणे, नियमित तन-मनाचा व्यायाम, छंदांची जोपासना, स्वत:च्या मनात नियमित डोकावून पाहणे, स्वत:च्या भावभावनांच्या बाबतीत सजग राहुन उर्जादायी गोष्टींचा अवलंब करत मनाचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक आहे.

खरंतर कोणताही भावनातिरेक हा त्रासदायक असतो. परंतु आपले विचार भावना याबाबतीत सजगता असेल तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. यापूर्वी अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे ...

अशी भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची यातील शून्य ही स्थिती (वाईटही नाही आणि चांगलेही नाही)अर्थात बॅलन्स दर्शविते. यातील अधिक अंकाची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आहे आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करुन रोज मनात डोकावून पहायचे आणि आपली तुलना आपल्यासोबतच करायची. नोंद करायची. कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे काही नकारात्मक भावना विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजे त्याची तीव्रता पाहता -1, -2 ही स्केल नैसर्गिक आहे, समजा आपण -1, -2 या पट्टीवर आहोत..ठीक. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत तर जात नाही ना याकडे लक्ष हवे. एखादा विचार वारंवार येऊ लागला आणि त्याचे चिंतेत रुपांतर होऊ लागले तर आपण -3,-4 स्केलवर आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना कुणाची तरी मदत, मार्गदर्शन आवश्यक आहे हे लक्षात घेउन वाटचाल करणे आवश्यक ठरेल. वेळीच घेतलेल्या खबरदारीमुळे संभाव्य धोके टाळता येतील. आपले मानसिक आरोग्य तपासण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

1.आपण स्वत:शी स्वस्थ आहोत का?

2.इतरांना आपल्या सहवासात स्वस्थ वाटते का?

3.आपल्या उणीवांचा शोध घेऊन त्या दूर करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत का?

याची उत्तरे नकारार्थी आल्यास मानसिक आरोग्याबाबत अधिक सजग होत योग्य उपाययोजनांच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. स्वत:च्या भाव भावना, विचार, मनातील खळबळ जाणून घेण्यासाठी आपणच स्वत:कडे प्रयत्नपूर्वक लक्ष द्यायला हवे हे मात्र खरे!!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.