For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेशन घोटाळ्यात टीएमसी नेत्याला अटक

06:12 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेशन घोटाळ्यात टीएमसी नेत्याला अटक
Advertisement

जमावाच्या हल्ल्यानंतरही ईडीची कारवाई : राज्य पोलिसांकडून हल्लेखोरांची शोधाशोध

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील बहुचर्चित रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने टीएमसी नेते आणि बोनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्य यांना अटक केली आहे. शंकर आद्य यांना बंगालच्या उत्तर 24 परगणा येथून अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी ईडीची टीम शंकर आद्य यांची सासरवाडी असलेल्या शिमुलतला येथे पोहोचली. यावेळी ईडीने सलग 17 तास तपासणी केल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आद्य यांना अटक करण्यात आली.

Advertisement

शंकर आद्य यांच्या अटकेच्या वेळीही त्यांच्या समर्थकांनी अटकेचा निषेध केला. यावेळी त्यांनी धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात आले. शंकर आद्य 2005 साली बोनगाव नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या पत्नी बोनगाव नगरपालिकेच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. शुक्रवारी ईडीच्या पथकांनी टीएमसी नेते शंकर आद्य आणि शाहजहान शेख यांच्या घरावर छापे टाकले होते. हे दोन्ही नेते पश्चिम बंगालच्या माजी अन्न मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देशभरात जोरदार कारवाई करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडी पश्चिम बंगालमध्ये सातत्याने कारवाई करत आहे.

आतापर्यंत 3 एफआयआर दाखल

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडी टीमवर जमावाने हल्ला केल्याने बंगालमध्ये शुक्रवारी मोठा गोंधळ उडाला. हा हल्ला टीएमसी नेत्याच्या समर्थकांनी केला असून त्यामध्ये ईडीच्या काही अधिकाऱ्यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे. ईडीच्या टीमवर हल्ला झाला त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे फक्त 27 कर्मचारी होते. या हल्ल्यात तपास पथकातील तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. हल्ल्यादरम्यान त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीटही जमावाने हिसकावून घेतले. याप्रकरणी कारवाई करत बंगाल पोलिसांनी आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवले आहेत.

राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी

या घटनेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जींविरोधात भाजप आणि काँग्रेसने आघाडी उघडत बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे भाजप आणि काँग्रेसने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असतानाच दुसरीकडे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. सर्व घटनात्मक पर्यायांचा विचार केला जाईल आणि या प्रकरणावर योग्य ती कारवाई केली जाईल. पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

Advertisement

.