‘तिरुपती’ कायदेशीर कारवाई करणार
प्रसाद लाडूंमध्ये गाय-डुकराच्या चरबीचे अंश आढळल्याने भाविकांमध्ये प्रचंड संताप
वृत्तसंस्था / तिरुपती
आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानच्या प्रसाद लाडूंमध्ये गाय आणि डुकराची चरबी तसेच माशांच्या तेलाची भेसळ आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भाविकांमध्ये तसेच संपूर्ण समाजामध्येच संतापाची भावना असून देशात अनेक स्थानी निषेधात्मक आंदोलने केली जात आहेत. तिरुपती देवस्थान व्यवस्थापन समितीने या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे.
हे प्रकरण गुरुवारी उघडकीस आले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या संबंधात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राज्यस्तरीय बैठकीत वक्तव्य केले. राष्ट्रीय अन्नचाचणी प्रयोगशाळेने या प्रसाद लाडूंचे परीक्षण केले असून अहवाल सादर केला आहे. या प्रसादात गाय तसेच डुकराची चरबी आणि माशांच्या तेलाचे अंश मोठ्या प्रमाणात आहेत, असे अहवालात नमूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागच्या सरकारच्या काळात...
चंद्राबाबू नायडू यांनी या भेसळीसाठी मागच्या वायएसआर काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. त्या सरकारच्या काळात प्रसादाचे लाडू बनविण्यासाठी जे तूप खरेदी केले गेले, त्या तुपात गाय, डुक्कर इत्यादी प्राण्यांची चरबी मिसळण्यात आली होती. त्यामुळे प्रसादाचे लाडू भेसळयुक्त झाले. तेलगु देशम आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर हे प्रकार बंद झाले असून आता गाईच्या शुद्ध तुपातील लाडू प्रसाद म्हणून वितरीत करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन नायडू यांनी केले. मात्र, वायएसआर काँग्रेसने आरोप फेटाळला आहे. या पक्षाने या आरोपाविरोधात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली असून, पक्षाचे नेते जगनमोहन रे•ाr यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र पाठवून हे आरोप खोटे असल्याचे प्रतिपादन केले आहे.
सनातन धर्मरक्षण मंडळाची मागणी
अलिकडच्या काळात हिंदूंच्या धर्मभावना दुखाविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तिरुपती प्रसादातील भेसळ हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्मरक्षक मंडळा’ची स्थापना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांनी केले. हा अत्यंत संवेदनशील आणि कोट्यावधी लोकांच्या भावनांचा प्रश्न असल्याने सनातन धर्माचे रक्षण कशाप्रकारे करता येईल, या मुद्द्यावर राजकीय पक्ष, धोरणकर्ते, धर्मगुरु, सामाजिक संस्था, न्यायव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांनी व्यापक चर्चा करणे अनिवार्य झाले आहे. तसे झाल्यासच सनातन धर्माची अवमानना थांबेल, असे वक्तव्य त्यांनी केले.
केंद्र सरकारने मागविला अहवाल
केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही या प्रकारासंबंधी संताप व्यक्त केला. हा प्रकार गंभीर असल्याने त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जनतेच्या भावनांशी असा खेळ करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावयास हवी. या प्रकरणाची व्यापक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारकडून अहवाल मागविला असून तो प्राप्त झाल्यानंतर त्वरित दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. दोषींना मोकळे सोडले जाणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
भेसळ मोठ्या प्रमाणात
प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. त्यामुळे लाडवांसाठीचे तूप पुरविणाऱ्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकार कोणी केला, कोणत्या उद्देशाने केला आणि तो किती काळापासूनचा आहे, हे शोधण्यात यावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता सोशल मिडियावरून सर्वसामान्य माणसाकडूनही केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. आंध्रप्रदेश सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे.
कारस्थानाचा संशय
तिरुपतीच्या प्रसाद लाडवांच्या निर्मितीसाठी गाईचे शुद्ध तूप उपयोगात आणले जाते. या तुपामध्ये इतर काही अंश किंचित प्रमाणात असू शकतात. गाईंना आहार कोणता दिला जातो, यावर तुपाची गुणवत्ता अवलंबून असते. तथापि, कोणत्याही परिस्थितीत गाईंना गाईंचीच चरबी किंवा डुकराची चरबी तसेच माशांचे तेल खाऊ घातले जात नाही. कारण तो गाईंचा आहार नाही. अशा स्थितीत तुपामध्ये या प्राण्यांच्या चरबी आणि तेलाचे अंश इतक्या मोठ्या प्रमाणात कसे आढळले, हा प्रश्न आहार आणि प्राणीखाद्य तज्ञांकडूनही विचारला जात आहे. त्यामुळे हे पदार्थ या तुपात गाईच्या दुधातून आलेले नसून ते नंतर मिसळण्यात आलेले आहेत, असा आरोप केला जात आहे. हा प्रकार सरळसरळ हिंदूंच्या भावना दुखाविण्याच्या कटकारस्थानाचा भाग आहे काय याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
व्यापक चौकशीची मागणी...
ड प्रसाद लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या व्यापक चौकशीची मागणी
ड आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची धर्मरक्षक मंडळ स्थापनेची मागणी
ड केंद्र सरकारने मागविला अहवाल, दोषींविरोधात होणार कठोरतम कारवाई
ड वायएसआर काँग्रेसच्या काळात भेसळ झाल्याचा चंद्राबाबू नायडूंचा आरोप