For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळ हेच औषध!

06:40 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
काळ हेच औषध
Advertisement

भळभळत्या अनेक जखमांवर काळ हेच औषध असते. त्यातही सळसळत्या रक्ताच्या एखाद्या पक्ष-संघटनेचे दुखणे खूपच वेगळे असते. त्यात पुन्हा ते एका परिवाराशी संबंधित असेल तर ते अधिक जटील बनते. एखाद्या अभेद्य विचाराला व त्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायला बाहेरून कितीही तोफा धडाडल्या तरी तडा जाणे मुश्किल. त्यासाठी आतूनच विरोध व्हावा लागतो. छगन भुजबळ व नारायण राणे जितके नुकसान करू शकले नाहीत तितके शिवसेनेचे नुकसान राज ठाकरे यांच्या जाण्याने नक्कीच झाले. वीस वर्षांपूर्वीची ही कहाणी. या वीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता अपयशाच्या अनेक फटक्यानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची भाषा करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत आपल्यातील किरकोळ मतभेद बाजूला ठेवून आपण मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. राज ठाकरे यांच्या टाळीला उशिरा प्रतिसाद देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मुलाखत प्रसारित होताच कामगार संघटनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणही जुने वाद विसरून एक व्हायला तयार आहोत मात्र भाजप, एकनाथ शिंदे यांचे कोणत्याही कारणांनी समर्थन करायचे नाही, त्यांना घरी जेवायला बोलवायचे नाही किंवा त्यांच्याशी पंगती उठवायच्या नाहीत या अटीवर एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. आता राज ठाकरे यांना या अटी मान्य होतात का हा प्रश्न आहे. कधीकाळी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचे समर्थक म्हणून मिरवणारे आणि आगीत तेल ओतणारे अनेक जण आता भाजप किंवा शिंदे सेनेमध्ये आहेत. त्यांनी ही युती होण्याची शक्यता नाकारत टीका केली आहे. तर दोन्ही पक्षातील काही जुन्या मंडळींनी एकत्र येण्याचे स्वागत केले आहे. नव्याने नेते झालेल्या काही मंडळींनी मात्र त्याला विरोध केला आहे. अर्थात ठाकरे काही लोकशाही मार्गाने याबद्दलचा निर्णय घेणारे नेते नव्हेत. त्यामुळे यापूर्वी हजारो लोकांनी रक्त आटवले, तितक्याच लोकांनी डोके फोड करून घेतली किंवा नेत्यांनी आपले अस्तित्व पणाला लावले तेव्हा जे भाऊ एकत्र आले नाहीत ते कदाचित यावेळी एकत्र येऊ शकतील. हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. खुद्द बाळासाहेब ठाकरे या भावांमधील भांडणे सोडवण्यात हतबल होते.  वेळोवेळी दोघांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. पण, प्रत्येक वेळी जवळच्या मंडळींनी काहीतरी घोळ घातला आणि त्याचे निमित्त होऊन यांची एकी होऊ शकली नाही. अर्थात दोघांच्या मनात असते तर आज जे त्यांना निरर्थक किंवा किरकोळ मुद्दे वाटतात त्या मुद्द्यांना ते तेव्हाही मागे टाकू शकले असते. आज परिस्थिती हाताबाहेर चालल्यानंतर ते एकत्र येत आहेत. त्यामुळे राज्यातील स्थिती बदलणार असेल व मराठी माणसांचे हित होणार असेल तर त्याचे स्वागत करता येईल. शिवसेना हा महाराष्ट्राचा स्वत:चा एक विचार आहे. त्या विचाराचे समर्थक असणारे विविध क्षेत्रातील लोक म्हणूनच शिवसेनेकडे नेहमीच आशेने पाहत आले आहेत. त्यांची आशा आणि गेल्या 20 वर्षांत जन्माला आलेली किंवा 25, 30 वर्षांत वाढलेली पिढी यांचे अनुभव वेगवेगळे आहेत. त्यांच्या आवडी, निवडी, पक्ष बदलले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी एक होणाऱ्या ठाकरे बंधूंनी आता साठी ओलांडली आहे. त्यामुळे या युतीचा जो मतदार असेल तो सोडून इतर वर्ग काय विचार करतो हे महत्त्वाचे असेल. सुदैवाने असे युवा नेतृत्व या पक्षाकडे आहे. मात्र त्या नेतृत्वाला व्यापक विचाराने पुढे जावे लागेल आणि शेतकऱ्यांपासून मुंबईतील बहुभाषिक मंडळींपर्यंत सर्वत्र प्रभाव वाढवावा लागणार आहे.

Advertisement

20 वर्षांपूर्वीची बात वेगळी होती. तेव्हा राज ठाकरे 13 आमदारांचे नेते झाले, नाशिक सारखी महापालिका त्यांनी जिंकून दाखवली नंतर त्यांच्या इंजिनाला जो उतार लागला त्यातून त्यांनी अनेकांशी हातमिळवणी करूनही इंजिन थांबा घ्यायला तयार नाही. मध्यंतरीच्या काळात बाळासाहेबांचे निधन झाले. नंतर शिवसेना व भाजप युती तुटली. उद्धव ठाकरे एकटे लढले आणि मोठ्या संख्येने आमदार निवडून आणले. भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने आपली सत्ता स्थापन केली आणि मोठ्या आमदार संख्येनंतरही 2014 ते 2019 अशी ठाकरेंची फरपट झाली. 2019 मध्ये राम मंदिरचा मुद्दा उचलून ‘मंदिर वहीं बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे’ असे डिवचत त्यांनी भाजपला पुन्हा युती करणे भाग पाडले. सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे पुरेशा जागा नाहीत आणि आपली आमदार संख्या प्रभावी आहे हे लक्षात घेऊन त्यांनी मुख्यमंत्रीपद हे बंद खोलीत ठरल्याप्रमाणे द्या अशी मागणी करून भाजपला कोंडीत पकडले. यावेळी राष्ट्रवादीशी व काँग्रेसशी तडजोड करण्याची वेळ उद्धव ठाकरेंची होती. त्याद्वारे ते मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी बंडखोर आमदारांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद भाजपने काढून घेतले. न्यायालयातील, विधिमंडळातील व निवडणूक आयोगातील लढाई उद्धव ठाकरे यांना जिंकता आली नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला 2024 ची लोकसभेची निवडणूक यश देऊन गेली मात्र विधानसभेची निवडणूक गमवावी लागली. मध्यंतरीच्या काळात शरद पवारांचा पक्षही फुटला आणि अजित पवार नव्या सत्तेत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. विधिमंडळ अधिवेशनात गलितगात्र  विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांचे भारी भक्कम बहुमत प्रभाव गाजवू लागले. विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनाही मोठा फटका बसला व स्वत:च्या मुलाचा पराभव त्यांना पहावा लागला. उद्धव ठाकरेंना मुंबईत साथ मिळाली असली तरी मध्यंतरीच्या काळात पक्षाचे विद्यमान नगरसेवक मोठ्या प्रमाणावर  शिंदे यांनी फोडून घेतले. अशा परिस्थितीत लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला महाराष्ट्रातील हे सर्व पक्ष सामोरे जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासमोर महापालिकेतील सत्ता अबाधित राखण्याचे मोठे आव्हान आहे. नगरसेवक गेले तरी कार्यकर्ता हललेला नाही हे त्यांचे म्हणणे खरे असले तरी हितसंबंधितांची जी साखळी गेल्या पाच निवडणुका उद्धव ठाकरे यांना यशस्वी करत होती त्यातले बहुतांशजण त्यांचा पक्ष सोडून गेले आहेत. त्यातील अनेक तिकिटा अभावी परततील किंवा मते खातील अशी सेनेला आशा आहे.  तर कधी एकनाथ शिंदे आणि कधी भाजप यांच्याशी राज ठाकरे चर्चा करत आले आहेत. हे सगळे सोडून ते खरोखर एक होतील का? मनाचे उत्तर होय आणि मेंदूचे नाही असेच सांगते.

Advertisement

Advertisement
Tags :

.